नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. देशभरातून निवडलेल्या ८४ पुरस्कारार्थींना आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमामध्ये हे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
संध्याकाळी होणाऱ्या या कार्याक्रमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमधील विविध मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळीही सहभागी होणार आहेत. भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातलेल्या ८४ मान्यवरांचा आज गौरव करण्यात येणार आहे. या सर्वांना पद्म पुरस्कारांमधील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यंदा राज्यांकडून अथवा राज्यपालांकडून शिफारस करण्यात आलेल्या एकाही व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी यंदा केंद्र सरकारने १० सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातूनच समाजाला माहित नसणारे, परंतु समाजसेवेचे अखंड व्रत अचारणाऱ्या मान्यवरांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
यंदा केंद्र सरकारकडून एकूण ८४ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये ३ पद्म विभूषण, ९ पद्म भूषण आणि ७२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे दोन टप्प्यांमध्ये वाटप होणार असून २ एप्रिलला देखील पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार आहे.