राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्र सरकारमधील विविध मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळीही उपस्थित होते.
आजच्या पुरस्कारांमध्ये बॅटमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि टेनिसपटू सोमदेव किशोर वर्मन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर श्रीमती लक्ष्मीकुट्टी यांना पारंपरिक औषधांसाठी, श्री नारायणदास महाराज यांना अाध्यात्मिक क्षेत्रात काम करण्यासाठी तसेच अनवर जलालपुरी यांना कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी मरणोपरांत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. वेदप्रकाश नंदा यांना शिक्षण आणि साहित्य क्षेत्रासाठी पद्मभूषण तर पी. परमेश्वरन् यांना देखील शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना कला आणि संगीत क्षेत्रात, इलायाराजा यांना देखील कला आणि संगीत क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदा राज्यांकडून अथवा राज्यपालांकडून शिफारस करण्यात आलेल्या एकाही व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी यंदा केंद्र सरकारने १० सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातूनच समाजाला माहित नसणारे, परंतु समाजसेवेचे अखंड व्रत अचारणाऱ्या मान्यवरांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांमध्ये ३ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ७२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे दोन टप्प्यांमध्ये वाटप होणार असून २ एप्रिलला देखील उरलेल्या पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार आहे. भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातलेल्या एकूण ८४ मान्यवरांचा गौरव राष्ट्रपती यांच्या हस्ते होणार आहे.