ठेवीदारांच्या संरक्षणासाठी सरकारचा निर्णय
मुंबई : वित्तीय संस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार एम.पी.आय.डी. कायद्यात बदल करणार असून याच अधिवेशनात पुढील आठवड्यात त्यासाठी विधेयकही आणले जाणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज विधानसभेत याबाबत माहिती दिली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेना आमदार सुभाष साबणे, भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वित्तीय आमिष दाखवून सामान्यांच्या फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यासाठीच एम.पी.आय.डी. कायदा करण्यात आला आहे. मात्र, या कायद्यात तरतूद करुन ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी कायद्यात बदल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भविष्यात अशा घटनांमधून सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी जागृती करणे आवश्यक असून त्यासाठी मोहिम हाती घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.