यावेळी व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, जि. प. सदस्य मंगलाबाई जाधव, सुनंदा चव्हाण, पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, सदस्य भाऊसाहेब केदार, कैलास निकम, भारती पाटील, शिवाजी सोनवणे, अजय पाटील, प्रिती चकोर, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, दिनेश बोरसे, सुनिल पाटील, दत्तु मोरे, सुभाष पाटील, जिभाऊ पाटील, बाजीराव दौंड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत अकरा कलमापैकी काही कलमे ही शेतकऱ्यांच्या वैयक्तीक लाभासाठी आहे. या अंतर्गत तालुक्यात एक लाख एकशे अकरा विहिरी जर घेतल्या तर 7 ते 8 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकते. महाराष्ट्रात जलयुक्त शिवारची कामे वेगात सुरु आहे. चाळीसगाव तालुक्यातही जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली आहे. टप्याटप्याने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येवून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यात येत आहे. शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. सेवा हमी कायद्यानुसार सर्व प्रकारचे उतारे विहित मुदतीत मिळणार आहे. अशा विविध प्रकारच्या कितीही योजना असल्या तरी त्या यशस्वीपणे राबविण्यात आल्या पाहिजे. चाळीसगाव तालुक्यात शासनाच्या योजना यशस्वी राबविण्यात येत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना गाय गोठा शेडचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगिले.
पर्यटनाला चालना मिळावी यासाठी चाळीसगाव येथील केकी मुस कलादालन, तितुर-डोंगरी नदी सुशोभिकरण आणि पाटणादेवी क्षेत्र विकासासाठी निधी देण्यात आला आहे. . जळगाव व चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार उन्मेश पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, शेतीला जोडधंदा मिळवा, शेती शाश्वत होण्यासाठी त्यांना पशुपालन व दुधव्यवसाय करता यावा यासाठी त्यांना गाय गोठा शेड मंजूर करण्यात येत आहे. यासाठी आठ हजार शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले असून हे प्रस्ताव दर महिन्याला दोन हजार असे टप्प्याटप्याने मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जे शेतकरी चांगल्या प्रकारचे शेड तयार करतील त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून गायी घेऊन देण्यात येतील. शेतकऱ्यांच्या विकास होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपसभापती संजय पाटील यांनी प्रस्तावना केली .
ना . जयकुमार रावल यांच्या हस्ते गाय गोठा शेड वाटप सोडतीच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी 14 बुथ लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शालीग्राम निकम यांनी केले. तर आभार सभापती स्मितल बोरसे यांनी केले.