सार्वजनिक वाहतुकीचा वापर; वाहतूक कोंडीवर पर्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
बेस्टच्या ताफ्यात आणखी ८० इलेक्ट्रीक बस सामिल होणार
 

 
 
मुंबई : सार्वजनिक वाहतुकीचा सर्वाधिक वापर हाच वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रदुषणावरील पर्याय असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या २५ हायब्रीड बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
 
या लोकार्पण सोहळ्यादरम्यान केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते प्रमुख, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु. पी. एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, गिरीश व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
 
पुढील काळात १०० टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच ‘एमएमआरडीए’च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बांद्रा कुर्ला संकुलात येणा-या गाड्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रदुषण आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. एमएमआरडीएने उड्डाण पुलाच्या माध्यमातून वाहतुकीसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्याशिवाय वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
 
 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रीक मोबिलिटीवर आणणार
इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्थेकडे जाणे ही काळाची गरज बनत चालली आहे. पुढील काळात सर्व बसेस या संपूर्णत: इलेट्रिकवर तंत्रज्ञानावर चालवण्यात येतील. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेट्रिक मोबिलिटीवर आणण्यात येणार आहे असून त्यासाठी आवश्यक चार्जिंग धोरण तयार करण्यात आले आहे. मुंबईतील ‘बेस्ट’ला सुद्धा आपल्या सर्व बस या इलेक्ट्रिक कराव्या लागणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
बेस्टसाठी आणखी ८० इलेक्ट्रिक बस देणार - अनंत गीते
केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून एमएमआरडीएला या बसेससाठी अनुदान देण्यात आले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या या नाविण्यपूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी देशातून सर्व प्रथम राज्य शासन व एमएमआरडीएने तयारी दर्शविली, असल्याची माहिती अनंत गीते यांनी दिली. या हायब्रीड बसमुळे ३० टक्क्यांपर्यंत प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. शून्य प्रदुषण हे उद्दिष्ट असून त्यासाठी उद्योगांना सोबत घेऊन जाण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. दरम्यान, अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘बेस्ट’ला यापूर्वी ४० इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरच ८० बसेस देण्यात येणार असल्याचेही गीते यावेळी म्हणाले.
 
हायब्रीड बसची वैशिष्ट्ये
३१ अधिक १ अशा आसन क्षमतेच्या एकूण २५ बसेस चालविणाऱ्या जाणार
बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते बांद्रा कुर्ला संकुल या मार्गावर चालणार
सकाळी ७.३० ते ८.३० आणि सायं. ६ ते ७ या वेळेत फेऱ्या चालणार
तसेच बांद्रा कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे स्थानक दरम्यान शटल सेवा
बेस्ट मार्फत ही सेवा चालविण्यात येत आहे.
भारतातील हायब्रीड श्रेणीतील मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित पहिली बस
हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर ३० टक्के बचत
इतर बसच्या तुलनेत २८ टक्के इंधन बचत
संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता
संपूर्ण वातानुकुलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सुविधा
आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन व व्हिलचेअरसाठी उताराची व्यवस्था
गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती
जीपीआरएस यंत्रणा
 
@@AUTHORINFO_V1@@