आराखड्याचे काम महिनाभरात पूर्ण होवून कामाला होणार सुरुवात, पुलासाठी होती ५० कोटीची मागणी
जळगाव :
शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीडब्लूडी व रेल्वेकडून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
शिवाज नगर उड्डाण पुलासाठी रेल्वेने निविदा काढली आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासन आणि रेल्वेमध्ये ५०-५० टक्के निधी देण्याबाबत करार झालेला आहे. मात्र, शासनाचा ५० टक्के निधी प्राप्त न झाल्याने हे काम थांबले होते. शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुलाच्या बांधकामासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. यामुळे पुलाच्या बांधकामास लवकरच सुरवात होणार आहे, अशी माहिती मनपाचे सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी दिली. पीडब्लूडीकडून पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम मिळून या पुलाचे काम हाती घेणार आहेत, अशी माहिती लढ्ढा यांनी दिली.
अपेक्षित निधी न मिळाल्याने जुन्या पुलाप्रमाणेच नवीन पूल - ५० कोटींची अपेक्षा असताना २५ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने जुन्या पुलाप्रमाणेच नवीन पुलदेखील तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुल तयार करताना एक रस्ता कानळद्याकडे जाणार्या भागाकडे वळविला होता, तर दुसरा रस्ता ममुराबादकडे जाणार्या रस्त्याकडे वळविण्याचे ठरविले होते. मात्र, २५ कोटीच्या निधीतून दोन रस्ते तयार करणे शक्य नसल्याने आता हा पुल जुन्याच पुलाप्रमाणे करण्यात येणार आहे. तसेच आणखी निधीची तरतूद करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. निधी प्राप्त झाल्यास ममुराबादकडे जाणारा रस्तादेखील तयार करण्यात येईल, अशी माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.
शासन होते नकारात्मक भूमिकेत
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. मात्र, या निधीबाबत शासन नकारात्मक भूमिकेत होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत निधीची तरतूद आवश्यक असल्याचे सांगत राज्य अर्थसंकल्पात या शिवाजीनगर पुलासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे लढ्ढा यांनी सांगितले.