प्रचिती देउया महसूली उध्दीष्टाची,
जुळती करुया जनकल्याणाची !
नवनियुक्त नाशिक विभागीय महसूल आयुक्त आर. आर. माने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत महसूल व जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
अभियानाचाच एक भाग म्हणून एका महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरीता मंडळ मुख्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन केले जाते. धुळे जिल्ह्यात फेब्रुवारी 2018 मध्ये 8300 फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित फेरफार नोंदी लवकरच निकाली काढण्यात येतील. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पाणंद, पांदण, शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. एक ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत 51 रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. या माध्यमातून मोकळ्या करण्यात आलेल्या रस्त्यांची लांबी 56.9 किलोमीटर एवढी आहे.
गेल्या काही वर्षात नागरिकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोजगार, शिक्षणासह विविध कारणांमुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. त्यास आपला धुळे जिल्हाही अपवाद नाही. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज वाढले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील तलाठी सजा व महसूल मंडळ निर्मितीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात नवीन 28 मंडळांची वाढ झाली असून नवीन तलाठी सजांची संख्या 166 ने वाढली आहे. नवीन सजा व तलाठी मंडळांमुळे महसूल विभागाचे कामकाज आणखी गतिमान होईल, असा मला विश्वास आहे. महसूल विभागातर्फे जात, उत्पन्न, अधिवास, रहिवास, नॉन क्रिमिलेअरसह विविध दाखल्यांचे वितरण केले जाते. एक ऑगस्ट 2017 पासून फेब्रुवारी 2018 अखेर दोन लाख 47 हजार 409 दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. दाखले वितरणांपैकी विविध ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विस्तारित समाधान योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त महोदयांनी दिले आहेत. त्यानुसार मंडळस्तरावर शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात येईल.
सातबारा संगणकीकरण हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाची धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व तलाठी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यातील काही तलाठी यांनी सातबारा संगणकीकरणात प्रावीण्य: मिळविले आहे. धुळे जिल्ह्यात 678 गावांचा समावेश आहे. त्यापैकी 566 गावांमधील खाते प्रोसेसिंग पूर्ण झाले आहे. तसेच अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या गावांची संख्या 469 एवढी आहे.