मिलिंद एकबोटेंवर कोठडीतील चौकशीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रश्नी मुख्यमंत्र्यांची माहिती

 
 
 
 
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. ते पसार झाल्यावर कोम्बिंग ऑपरेशन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मिलिंद एकबोटे यांच्यावर कोठडीतील चौकशीसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी विधानपरिषदेत करण्यात आलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी उत्तर दिले. दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नानंतर दंगलीआधी एकबोटे यांनी घेतलेल्या परिषदेचीही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी महाराजांची समाधी राज्य सरकार ताब्यात घेणार असून, त्याची सगळी व्यवस्था राज्य सरकार पाहणार आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. या संपूर्ण प्रकरणात कुणाचीही चूक असो, कठोर कारवाई करु, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
गंभीर गुन्ह्यांबद्दल समिती निर्णय घेणार
सदर हिंसाचार प्रकरणी ५८ गुन्हे दाखल झाले असून, १६२ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, गंभीर खटल्यांच्या बाबतीत समिती निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून पुढील तीन महिन्यात याबाबत पोलीस समितीकडे अहवाल सादर करणार आहेत. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काहींनी वाहत्या गंगेत हात धुवत लुटमार केली होती. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
२ हजार ५३ जणांवर प्रतिबंधकात्मक कारवाई
 
हिंसाचाराच्या घटनेनंतर एकूण १७ अट्रोसिटी आणि ६०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात ११९९ आरोपींना अटक करण्यात आली असून, २ हजार ५३ व्यक्तींवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सरकार व्यक्ती, जाती आणि धर्म निरपेक्ष भूमिकेतून कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
एकूण १३ कोटींचे नुकसान
भीमा कोरेगाव हिंसाचारदरम्यान एकूण १३ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. यामध्ये घटनेच्या ठिकाणी एकूण ९ कोटी ४५ लाख ४९ हजार ९५ रुपयांचे नुकसान झाले असून यापैकी दलित समाजाचे एक कोटींहून अधिक, तर मुस्लिम समाजाचे ८५लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. तसेच सवर्ण समाजाचे ४ कोटीहून अधिक नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकार याप्रकरणी सर्वांना नुकसान भरपाई देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@