पुणे : गेल्या २५ वर्षांमध्ये त्रिपुरातील जनतेला जाणून-बुजून गरीब ठेवले गेले, त्यांच्या गरिबीचे दुकान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने चालवले, असा आरोप त्रिपुरा येथील भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी केले. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर देवधर यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते त्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन विवेक समूहातर्फे करण्यात आले होते.
त्रिपुरा येथे तब्बल २५ वर्षे सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाला प्रथमच सत्ता स्थापन करता आली आहे. मूळ महाराष्ट्राचे असलेल्या सुनील देवधर यांना या विजयाचे शिल्पकार म्हटले जाते. त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकालानंतर ते प्रथमच महाराष्ट्रात आले होते. त्यानिमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती.
त्रिपुरा येथे ६७% पेक्षा अधिक लोक स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देखील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. माणिक सरकार यांच्या काळात आत्तापर्यंत देखील तेथील लोकांना थेट बँक खात्यात पैसे दिले जात नसत, मनरेगा सारख्या योजनांच्या मिळकतीत देखील सरकारी यंत्रणा कमिशन खात असे, त्रिपुरा येथे औद्योगिकरण नाही, तेथील तरुणांना सरकारी योजनेतून देखील रोजगार उत्पन्न केले गेले नाहीत, असा सर्व खुलासा त्यांनी यावेळी केला.
माणिक सरकार यांच्या कालावधीत त्रिपुरातील जनतेला कम्युनिस्ट पक्षाच्या गुंडांच्या दहशतीखाली वागवले जात होते, कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य नसलेल्या नागरिकांच्या हत्या केल्या जात होत्या, या सर्वाला त्रिपुराची जनता कंटाळलेली होती, त्रिपुराची जनता १९९८, २००३, २००८ आणि २०१३ साली देखील पर्यायाच्या शोधात होती, मात्र तो सक्षम पर्याय भाजपच्या रूपाने २०१८ साली मिळाला आणि म्हणून हे सत्तांतर झाले, असे देवधर यांनी सांगितले.
पहा संपूर्ण व्हिडीओ