वादग्रस्त आणि निर्विवाद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018   
Total Views |
गेल्या काही दिवसांपासून न्यायमूर्ती लोयांच्या शंकास्पद म्हणजे वादग्रस्त मृत्यूवरून खूप खळबळ उडवून देण्यात आली आहे. अगदी गतवर्षीच्या अखेरीस, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनीही बंडाचा झेंडा हाती घेताना त्यावरून पुरोगामी वादळ उठवले होते. अर्थात, कुठल्याही शंकास्पद मृत्यू वा हत्येबद्दल प्रश्न विचारले जाणे चुकीचे म्हणता येणार नाही. पण, अशा शंका वा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ व कारणही तितकेच महत्त्वाचे असते. तो संदर्भ सोडून अशा प्रश्नाकडे न्यायाची मागणी म्हणून बघता येणार नाही. जेव्हा अशाच स्वरूपाच्या अन्य हत्या वा मृत्यूविषयी पद्धतशीर मौन धारण केले जाते, तेव्हा उरलेल्या विषयात शंका काढणे हेतुपुरस्सर असल्याचा संशय येणे स्वाभाविक असते. न्या. लोया प्रकरणातील गदारोळ तसाच राजकीय होता आणि त्यांच्या नावाने न्यायाचा जोगवा मागण्याचा विषय न्यायाशी संबंधित नव्हता, तर त्यात राजकारण भरलेले होते. तेच आता त्रिपुरातील लेनिन पुतळ्यावरही म्हणता येईल. कारण, पुतळ्यांची विटंबना हेच दुखणे असेल, तर पुण्यातले अनेक पुतळे अगदी अलीकडल्या काळात फोडण्याचे-तोडण्याचे प्रकार घडलेले होते. पण, त्या वेळी यांपैकी कुणालाही त्याची कुठली दखल घेण्याची गरज वाटलेली नव्हती. मग यांच्या न्यायाची वा संवेदनशीलतेची व्याख्या कोणती, असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. कोण मारला जातो वा कुठल्या पुतळ्याची विटंबना झाली, ही बाब दुय्यम होते आणि तो पुतळा फोडला कुणी वा मारला कुणी या निकषावर मागण्या होतात, तेव्हा निदान तटस्थतेचा मुखवटा चढवण्यात अर्थ उरत नाही. न्या. लोयांच्या मृत्यूला तीन वर्षे उलटून गेल्यावर ज्यांना त्यामागचे सत्य शोधण्याचा अट्‌टहास करावासा वाटतो, त्यात सत्याची ओढ असती, तर त्यांपैकी अनेकांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वा दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूविषयी तितकीच आस्था दाखवली असती.
जनसंघ वा संघाशी संबंधित अशा दोन मोठ्या नेत्यांच्या हत्या वा मृत्यू कायम संशयाच्या भोवर्‍यात राहिले आहेत. त्याबद्दल संघ वा भाजपाच्या लोकांनी सातत्याने आवाज उठवलेला होता. पण, त्यांच्या त्या मागणीला साथ द्यायला कुणी पुरोगामी गोटातून पुढे आलेला नव्हता. याचे काय कारण असावे? ज्या पत्रकारांनी वा अन्य माध्यमांनी लोया प्रकरणात न्यायाचा आवाज उठवण्याचा आव आणलेला होता, त्यांपैकी किती जणांनी उपाध्याय वा श्यामाप्रसाद यांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य उजेडात यावे म्हणून प्रश्न विचारले आहेत? नसतील तर का विचारले नाहीत? त्याची काय कारणे आहेत? संघाचा वा भाजपा-जनसंघाचा कुणी मारला गेला व त्याचा मृत्यू शंकास्पद असेल, तर तो नैसर्गिक मृत्यू मानावा; असे पुरोगामी विचारांचे सूत्र आहे काय? तशी काही भारतीय राज्यघटना वा कायद्यात तरतूद केलेली आहे काय? नसेल तर तितक्याच आवेशात यांपैकी कुणी त्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मृत्यूची चौकशी कधीच का मागितली नाही? त्याचे कारण स्पष्ट आहे. माणूस मारला जाण्याला महत्त्व नाही. तो कुठल्या विचारांचा आहे किंवा त्याला मारणारा कुठल्या राजकीय गोटातला आहे, त्यानुसार पक्षपाती भूमिका घेण्याला पुरोगामित्व संबोधले जात असते. म्हणून तर दाभोळकर वा पानसरे पुरोगामी असतानाही त्यांच्या हत्येविषयी हळहळ व्यक्त करण्यासाठी इतरेजनांवर दबाव आणला जातो. पण, संघाच्या कुणाची केरळ-त्रिपुरात हत्या झाली, तर पुरोगामी गोटात कटाक्षाने मौन पाळले जाते. कधीकधी तर मृताला दाखलेबाज वा हिंदू दहशतवादी ठरवून पाठ फिरवण्याचीही तरतूद आधीच केलेली आहे. त्यामुळे वादग्रस्त व निर्विवाद या शब्दांच्या पुरोगामी व्याख्याच वेगळ्या आहेत. साहजिकच त्याचीच पडछाया त्रिपुरातील लेनिन पुतळ्यावर पडलेली आहे. त्यावरून प्रचंड काहूर माजवले गेलेले आहे.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या लालमहाल या ऐतिहासिक वास्तूमधील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मूळ शिल्पातून कापून काढण्यात आला. ती कोणत्या लोकशाही सभ्यतेची साक्ष होती? दूर त्रिपुरातला पुतळा उखडल्याने विचलित झालेल्यांना, आपल्या शेजारी पुण्यातल्या राम गणेश गडकरींचा पुतळा उखडल्याने झोपमोडही झालेली नव्हती. ही कसली संवेदनशीलता असते? कारण, तिथे संघविरोधी झुंड म्हणजे संभाजी ब्रिगेड उचापतखोर असते. त्यांच्या पाठीशी कोळसे-पाटील हे पुरोगामी न्यायाधीश असतात. तेच मग शनवारवाड्याच्या समोर भरलेल्या एल्गार परिषदेचेही पाहुणे असतात. हा मोठा फरक असतो. कृती वा मानवी हत्या महत्त्वाची नसते, तर कुणाच्या कृपेने वा आशीर्वादाने अशी कृत्ये होतात, त्यावर प्रतिक्रिया अवलंबून असतात. त्या वादग्रस्त वा वादातीत तेव्हा होतात, जेव्हा त्यांचे नातेगोते शोधून काढले जातात. निरपेक्षता अशी पक्षपाती झाली आहे. केरळात मधू नावाच्या गरीब आदिवासीला तांदूळ चोरले म्हणून जमावाने ठार मारले, तर प्राथमिक प्रतिक्रिया जोरात होती. पण, लवकरच त्या हत्येमागे हिंदू जमाव नसून मुस्लिम पोरांनी मारल्याचे निष्पन्न होताच, सगळ्या संवेदना बधिर होऊन जातात. पण, दिल्लीनजीकच्या अखलाखला तसाच जमावाने मारला असूनही प्रतिक्रिया भिन्न व दीर्घकालीन असतात. अखलाखला मारणारा जमाव हिंदू असल्याने, घटना मोठी वादग्रस्त होते आणि मधूला मारणारा जमाव मुस्लिम असल्याने घटना निर्विवाद होऊन जाते. शिवसेनेने कुणाला चोपले तर आविष्कारस्वातंत्र्याची भयंकर गळचेपी होऊन जाते आणि पॅरिसमध्ये शार्ली हेब्दोच्या व्यंग्यचित्रकार संपादकांचे सामुदायिक शिरकाण झाले, तरी ते क्षम्य कृत्य असते. थोडक्यात, पुरोगामी शब्दकोशात गुन्हे वा पापकर्माच्या व्याख्या व व्याप्ती संदर्भानुसार कायम बदलत असतात. कृती वा घटना दुय्यम असून गुंतलेले कोण, त्यावर प्रतिक्रिया बनणे ही संवेदनशीलता असते.
एकूणच, पुरोगामित्व इतके पोरकट वा बालिश झाले आहे, की आता रस्त्यावरच्या सामान्य माणसालाही त्यातला खुळेपणा व खोटेपणा लक्षात येऊ लागला आहे! म्हणूनच या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तुमच्या हातात सत्ता असताना, सरसंघचालक मोहनजी भागवतांच्या, राष्ट्रध्वजाच्या साध्या कार्यक्रमावर बंदी घातली जात होती, तो कुठला सभ्यपणा व लोकशाही होती? 'ज्याच्या हाती लाठी त्याची म्हैस!' हाच नियम पुरोगाम्यांनी लोकशाहीचा पायंडा बनवला होता ना? बंगालमध्ये ममता दुसरे काय करीत आहेत? सत्ता किंवा बळ हाती आल्यावर मनमानी करण्याला लोकशाही मानावे लागेल, असे कृतीतून कुणी दाखवून दिले आहे? त्याची प्रतिक्रिया मग सत्तांतरानंतर उमटत असते. लक्षात ठेवा, त्रिपुरात सत्ता भाजपाने हाती घेतली जाण्यापूर्वी पुतळा तोडला गेला आणि तो सरकारने पाडलेला नाही. ती जमावाची प्रतिक्रिया आहे. पण, ममता किंवा पिनाराय विजयन्‌ तर सत्तेचा वापर करून मुस्काटदाबी व दहशत माजवत आहेत ना? मग त्यावर ज्याने कुणी आवाज उठवलेला असेल, त्यालाच आता लेनिनचा पुतळा फोडणार्‍यांचा निषेध करता येईल. तेव्हा मिठाची गुळणी घेऊन बसलेल्यांनी बोंबा ठोकण्याची काहीही गरज नाही. कारण, आज पुतळे फोडणारेही पुरोगामी पायंड्याचे अनुकरण करत आहेत. तिला पुरोगामी कृती नक्की म्हणता येईल. जे कुणी ममता वा विजयन्‌ यांना पूर्वी जाब विचारत होते, त्यांनीही जर चुकीचे कृत्य केले तर त्याचे समर्थन करण्याचे काहीही कारण नाही. कारण जे कृत्य चुकीचे आहे, त्याला वैचारिक पाठिंबा असू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुतळे फोडणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व राज्यांना त्यामुळेच दिले आहेत. मुद्दा चुकीच्या कृती वा गुन्ह्याचा आहे, तो कुणी केला, याला अजीबात महत्त्व नाही...
@@AUTHORINFO_V1@@