जळगाव :
राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा शनिवारी राजकीय वर्तुळात रंगली होती. खडसे यांनी मात्र, दिल्लीत जाण्यास उत्सुक नसल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.
राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. यातील ६ जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता ३ जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे या जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवते याची उत्सुकता अनेकांना आहे.
विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील, तर स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे यांनी देखील राज्यसभेवर जाण्याचा भाजपचा प्रस्ताव स्वीकारला असल्याची चर्चा शनिवारी राजकीय वर्तुळात होती. राणे यांनी नाराजीतून कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांना महाराष्ट्रातच मंत्रिपद मिळण्याची आशा होती. जावडेकर आणि राणे यांच्या बरोबरीने माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचेही नाव राज्यसभेसाठी जोडले जात आहे. परंतु आपण दिल्लीत जाण्यास उत्सुक नसल्याचे खडसे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले. १६ राज्यातील एकूण ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे ५८ खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १०, तर महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. २३ तारखेला सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नारायण राणे राज्यसभा निवडणुकीसाठी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ मार्च असून, राणे त्याच दिवशी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती राणेंच्या निकटसूत्रांनी दिली.