पश्चिमेकडील पुलावर छत टाकण्रासाठी लागणार आणखी काही महिने
डोंबिवली : येथील पूर्वेतील प्रवासी पादचारी पुलावरील फेब्रिक शेड टाकण्याचे काम उशिरा का होईना पूर्ण झाले पण पश्चिमेतील स्टेशनला लागून असलेल्या कामाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने पश्चिमेकडील बाजूस उतरणाऱ्या प्रवाशांना भरदुपारी उन्हातून चालत जावे लागत आहे.
केडीएमसीच्या वतीने २०१६ साली डोंबिवली पूर्वेतील स्टेशन रोड परिसरातील पुलावर तसेच पश्चिमेतील द्वारका हॉटेलजवळील पुलावर फेब्रिक शेड टाकण्याचे काम करण्यात आले, पण हे काम पूर्ण होऊन सुमारे १ वर्षाचा कालावधी उलटला तरी पश्चिमेतील मच्छी मार्केटकडे जाणार्या पुलाचे काम मात्र दुर्लक्षित आहे. या फेब्रिक शेड कामाची सुरुवात पश्चिमेतील द्वारका हॉटेलजवळील पुलावरूनच करण्यात आली होती. त्या दरम्यान या पुलाचे कामही पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने व्यक्त केली जात होती मात्र आजच्या घडीला या कामाचा विसर केडीएमसीला पडला असल्याचे चित्र उभे राहिले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग असून तसेच या ब्रिजलगतच रिक्षा थांबा असल्याने अधिकतर प्रवाशांच्या वतीने या पुलाचा वापर केला जातो.
नुकतेच या पुलाजवळ लिफ्टच्या कामाला सुरुवात झाली असली तरी फेब्रिक शेड बसविण्याचे काम मात्र कागदपत्रावर सीमित राहिले आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवली महपालिकेच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने केला जातो. याचा प्रत्यय पश्चिमेतील प्रवाशांना परत एकदा आला आहे. याचबरोबर पूर्वेतील पादचारी पूलही दुर्लक्षित झाला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता निविदा प्रक्रियेत हे काम रखडले असून तूर्तास या कामाला अजून ३ ते ४ महिने लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्कायवॉक विद्रूप
डोंबिवलीकरांना उन्हातान्हातून वाचविण्यासाठी पूर्वेतील तसेच पश्चिमेतील रेल्वे पुलावर फेब्रिक शेड टाकण्याचे काम केले गेले आहे पण सद्यस्थितीला हा पूल स्वतःच घाणीचे ठिकाण होत असून या इकोफ्रेंडली शेडवर आलेल्या जाळ्या या स्मार्ट शहराचे रूप विद्रूप करणारे ठरत आहे. पुलावर बसणार्या भाजीवाल्यांनी टाकलेला कचरा यामुळे पश्चिमेतील स्कायवॉक दुर्लक्षित होत आहे. हीच परिस्थिती पूर्वेकडील नुकत्याच झालेल्या स्कायवॉकवर दिसून येते. काही ठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या, शिवाय फेरीवाल्यांनी टाकलेला कचरा व भिकाऱ्यांचे बस्तान यामुळे हा स्कायवॉक विद्रूपतेकडे वाटचाल करत आहे. तसेच या सर्व परिस्थितीकडे पालिकेचेही दुर्लक्ष झाले आहे.