मोहोर जळण्याची भीती
खानिवडे : चालू वर्षी बराच काळ नियमित राहिलेल्या थंडीने खुशीत असलेल्या बळीराजाला सध्या आकस्मिक बदलणा-या वातावरणाचा विपरीत परिणाम पिकांवर होईल, अशा चिंतेने ग्रासले आहे.
वसई तालुक्यातील शेतक-यांनी खरिपानंतर आपल्या शेतात द्विदल धान्य वाल, पावटा, तूर, मूग, चणे पेरले असून त्यांचा बाज सुरू झाला आहे. तसेच भेंडी, गवार, पालक, मुळा, कोथिंबीर, वांगी, कारली, दुधी, टोमॅटो आदी भाजीचे मळेही चांगले फुलवले आहेत. मात्र अधूनमधून होणा-या ढगाळ वातावरणाचा परिणामहा वरील पिकांसह पुढील हंगामात येणा-या आंबा, काजू, चिकू, जांभूळ आदी फळपिकांच्या मोहोरावर होऊन मोहोर करपतो व धरलेली छोटी फळे गळून जातात. ही स्थिती उत्पादनात मोठी घट निर्माण करणारी आहे.
६ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच वसईत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने येथील रब्बी पीक घेणारे शेतकरी व फळांचे बागायतदार हवालदिल झाले आहेत. यावर उपाय म्हणून शेतकी विभाग वसई तालुका कृषी अधिका-यांकडून असे सांगण्यात आले आहे की, वाढते तापमान व कोरडे हवामान लक्षात घेऊन आंब्यांच्या झाडांना प्रति झाड १५० ते २०० लीटर पाणी १५ दिवसाच्या अंतराने द्यावे व फळगळ कमी करण्यासाठी २० पीपीएम (PPM) (१ ग्रॅम५० लिटर पाण्यात) नॅफ्थॉलिक ऍसेटिक ऍसिड (N) या संजीवकाचे द्रावण मोहोरावर फवारावे. यामुळे मोहोर व फळगळ कमी होण्यास मदत होईल व पुढे होणा-या फळ उत्पादनावर कमी परिणाम होऊन उत्पन्न मिळेल.