नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज ‘पंतप्रधान श्रम पुरस्कारां’चे वितरण केले आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण ३३८ कामगारांना हे पुरस्कार व्यंकय्या नायडू यांनी प्रदान केले. यावेळी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार उपस्थित होते. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी वर्षं २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१५ आणि २०१६ मधील १९४ प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले.
हे पुरस्कार कामगारांच्या उच्च दर्जाच्या कर्तृत्वावर, उत्पादनक्षमता, सुरक्षा, गुणवत्ता, सिद्ध केलेली अभिनव क्षमता, संसाधनांचे संरक्षण, मनाची उपस्थिती आणि धैर्य यांच्या क्षमतेवर दिले जातात. तसेच जे कामगार आपला जीव धोक्यात घालून आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवतात तसेच यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देतात त्यांना हे पुरस्कार बहाल केले जातात.
श्रम रत्न पुरस्कार हा पुरस्कार या श्रेणीतील सगळ्यात उच्च पुरस्कार मानला जातो. २ लाख रुपये अशी या पुरस्काराची रक्कम असून हा पुरस्कार टाटा स्टील लिमिटेडचे प्रभारी सुब्रत कुमार यांना देण्यात आला आहे. २०१२ साली जमशेदपूरमध्ये त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारांमध्ये पाच महिला कामगारांना श्रम भूषण पुरस्कार देण्यात आले. या पुरस्काराची रक्कम १ लाख रुपये आहे. तर यात श्रम वीरांगना पुरस्कार चार महिला कामगारांना देण्यात आले ज्याची पुरस्कार रक्कम ६० हजार येवढी आहे. अकरा महिला कामगारांना श्रम देवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची रक्कम ४० हजार येवढी आहे.