नातं तुटलं....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |


वरील शब्द उच्चारल्यावर अरे रेरे रे...ही अगदीच स्वाभाविक आणि सहज प्रतिक्रिया जवळजवळ प्रत्येकाची असते. जे नातं आपण अनेक वर्ष, महीने जपलेल, फुलवलेलं आणि टिकवलेल असत, ते तुटल्यावर दु:ख होणं, वाईट वाटण साहजिकच आहे.



मग का बरं तुटतात नाती ? कोण तोडतं, त्या नात्यातली कोणीतरी एक व्यक्ती, का दोघ मिळून परस्पर संमतीने का अन्य कोणी व्यक्ती वा परिस्थिती कारणीभूत होते, नातं तुटायला ?


आणि जर ते नातं आपण स्वीकारल होत, म्हणजेच आपल्याला ते हवं होत, इतका विशिष्ट कालावधी आपण त्या नात्याचे सुख अनुभवले होते तर मग तुटेपर्यंत आपण का ताणल ? किंवा तशी चिन्हे दिसू लागताच आपण काही काळजी का नाही घेतली ?
किती हे प्रश्न, आणि त्यांची उत्तर कोण देणार?



कोणीच नाही, ही उत्तर ज्याची त्यानीच शोधायची असतात. दुसऱ्याचा सल्ला वगैरे फारसा उपयोगी पडतच नाही, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिचा स्वभाव वेगळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नात्यात वागण्याची पद्धत सर्वस्वी भिन्न. एकच स्त्री बायको, आई, सून, मुलगी, बहीण या नात्यांत वेगळी वागेलच पण दहा मैत्रीणींशीही ती वेगवेगळ्या प्रकारे वागते आणि ते अगदी नैसर्गिक आहे कारण आपलं वागणं हे जितकं आपल वैयक्तिक असत तितकच ते समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरही अवलंबून असत.



शेवटी नातं हा नेहमीच two way traffic असतो, असलाच पाहिजे. कारण जर तो one way traffic झाला तर एकतर ते नात म्हणजे ओझं, जबरदस्ती, नाईलाज होऊन बसत किंवा ते मरत.


आणि जर नात्यात traffic jam झाला तर मग गैरसमजांची गुंतागुंत एवढी वाढते की कोण्याच्यातरी शरीराला, मनाला, अगदी संपूर्ण व्यक्तीमत्वालाच धोका निर्माण होऊ शकतो.



म्हणूनच नात्यातला गोडवा, मिठास टिकवायची जबाबदारी दोन्ही व्यक्तींची समसमान भागीदारी असते. पण प्रेमाने, समजूतीने आणि आपलेपणाने, आपणहून केलेली, न सांगता, मनाचा मनाशी संवाद. एक अतूट बंधन, हवहवस वाटणार, स्वेच्छेने स्वीकारलेल.
गुरुजी म्हणतात ,' Responsibilities are taken and not given.' अगदी असच.



' शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले '....


मग ते नात कोणतही असू दे... आई-मुलगा, बाप-लेक, बहीण-भाऊ, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रीण, गुरू-शिष्य किंवा साक्षात परमेश्वराशी असलेल नातं.



प्रत्यक्ष व्यवहारात अनेकदा नात्यात अपेक्षा नसावी, असं म्हटल जात खर, पण वस्तुत: कुठलच नातं अपेक्षा विरहीत असूच शकत नाही. आई मुलाला माया, ममता, वात्सल्य देते आणि मुलगा तिला मातृत्व देतो. भक्त परमेश्वराची प्रार्थना, आराधना, उपासना करतो आणि परमेश्वर त्याला कृपाशिर्वाद देतो. फक्त ही देवाणघेवाण आत्यंतिक प्रेम, माया, सुख, आनंद यांनी युक्त असल्याने ती जाणवत नाही, एवढेच.


'एकोsम् बहवो स्यात् ! ....

या तत्वातूनच मानवाची निर्मिती झाली असल्याने माणूस कधीच एकटा राहू शकत नाही. तो समाजशील असल्याने नात ही त्याची सर्वार्थाने असलेली गरज आहे. त्याचा जन्मही एकत्रीकरणातूनच झाला असल्याने तो एकटा, एकाकी राहूच शकत नाही, फक्त स्वतः चा अहंकार, मानसन्मान अश्या फसव्या कल्पनांना बळी पडून कधी कधी तो नात्याचा, व्यक्तीचा अनादर करतो आणि एकाकीपण स्वतःच ओढवून घेतो.


जर कुठलही नात संपवण्याच्या आधी क्षणभर शांत चित्ताने विचार केला की जे नात आज मला नकोस वाटतय, संपवावस वाटतय ते नात मी इतकी वर्षे, महीने का टिकवल ?


या नात्याने मला खरच फक्त यातनाच दिल्या का काही सुखाचे, समाधानाचे क्षणही दिले ? मी हे नात तोडल्यावर त्याचा दुसऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होईल ? तोडण्याआधी मी जोडण्यासाठी काय प्रयत्न केले ? आणि तोडायचच होत तर मी नात जोडलच का? दुसऱ्याच्या भावनांशी खेळण्याचा हक्क मला कोणी दिला ?

अरे बाप रे, ही तर प्रश्नांची सरबत्तीच झाली. ( माझ्यात examinar संचारला की काय ?.....पुन्हा एक प्रश्न )

अर्थात याचा अर्थ जीवनसत्व संपलेल, अर्थहीन, त्रासदायक बनलेल नात्याच ओढण केवळ नाईलाज म्हणून बाळगाव असही नव्हे, तेव्हा मुक्तीचा मार्ग केव्हाही प्रशस्तच.


असो... माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटाच मृत्यू पावतो, हे वाक्य शास्त्रीयदृष्ट्या कितीही बरोबर असलं तरी तो जन्म आणि मृत्यू या दोन्ही अवस्थांमध्येही नात्यांनी बांधलेलाच असतो. ही असंख्य सुंदर नातीच त्याच्या आगमनाची डोळ्यात आनंदाश्रू घेऊन वाट पाहात असतात आणि निर्गमनाच्यावेळी त्याच्यासोबतही जायला तयार असतात. अस हे नात्यांच महत्व, त्यांच्यात आपुलकीचा गोडवा भरायचा की राग, द्वेष, वैर, अपमान, अहंकार यांच किल्मिष भरायच हे ज्याच त्यानी ठरवायच.

ना जाने कितने रिश्ते खत्म कर दिये इस भ्रम ने, कि मैं सही हूं और सिर्फ मैं ही सही हूं....


नाती आणि बर्फाचे गोळे एक सारखेच असतात, ज्यांना बनवण सोप असत पण टिकवण खूप अवघड असत...


नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नातं टिकवायच असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी....

मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या मरत नाही, तिरस्कार, दुर्लक्ष, अविश्वास आणि गैरसमजामुळे माणूसच ते संपवतो....

The best relation is one in which yesterday's fight doesn't stop today's communication.

- डॉ. अनुपमा माढेकर
@@AUTHORINFO_V1@@