मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक भाग्यवान आहेत कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा डोळे आहेत तर इंग्रजी भाषा चष्मा आहे. डोळे नसतील तर चष्मा घालण्यात काही अर्थ नाही. तसेच ‘छडी लागे छमछम’चे दिवस जाऊन आता विद्यार्थ्यांशी सवांद साधण्याचे दिवस आहेत. शिक्षणातून ‘३ – इडियटस’ सिनेमातील चतुर रामलिंगमसारखे नाही तर रँचोसारखे तरूण निर्माण करायचे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. चेंबूर एज्यूकेशन सोसायटीच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेचा हिरक महोत्सवी सांगता समारोह शनिवारी चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी तावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे अरविंद तांबे, उद्योगपती प्रशांत संकपाळ, शाळेचे माजी विद्यार्थी संजय गर्जे, मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे, आणि चेंबूर एज्यूकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकार उपस्थित होते.
उपस्थित पालकांनी यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लहान मुलांच्या खाजगी शिकवणीच्या समस्या, लैंगिक शिक्षणाची गरज आहे का, इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे शैक्षणिक धोरण आदींवर प्रश्न विचारले. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली. त्यानंतर अरविंद तांबे, प्रशांत संकपाळ, संजय गर्जे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचा संक्षिप्त इतिहास सांगताना मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांनी मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्याची गरज विषद केली. याच कार्यक्रमामध्ये शाळेचे कला शिक्षक नितिन यादव यांच्या चित्रप्रदर्शनीचे उद्धाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.