‘‘१९८० च्या दशकात भाजप ज्या गतीने वाढला, त्यापेक्षा एआययूडीएफ हा पक्ष अधिक वेगाने वाढत आहे,’’ असा दाखला लष्कर प्रमुखांनी दिला आणि पुरोगामी बुद्धिजीवींच्या कळपात भडका उडाला. लष्कर प्रमुखांनी भाजपचे नाव घेणे म्हणजे या लोकांच्या दृष्टीने महत्पापच. लष्कर प्रमुखांच्या तोंडून भाजपचे नाव ऐकताच त्यांच्यावर ही मंडळी टोळधाडीसारखी तुटून पडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने प्रवचने झोडणार्या ढोंगबाजांना लष्कर प्रमुखांनी आपल्या अभिव्यक्तीतून नियंत्रण रेषा ओलांडल्याचा साक्षात्कार झाला. कोणीतरी लष्कर प्रमुखांना जाब विचारलाच पाहिजे, असे म्हणत या लोकांनी मग बिपीन रावत यांना झोडपायला सुरुवात केली. पण, लष्कर प्रमुखांवर टीका करणार्या महाभागांना ते नेमके काय म्हणाले, याचा अर्थबोध तरी झाला का, याचीच शंका वाटते.
देशावर कोणत्याही प्रकारचे संकट वा नैसर्गिक आपत्ती आली की त्याच्या निवारणासाठी लष्कराला पाचारण केले जाते. अगदी मुंबईतील एखाद्या रेल्वेस्थानकातील पुलाच्या उभारणीपासून ते जम्मू-काश्मिरात आलेल्या प्रलयातून, भूकंपातून माणसांना वाचविण्यापर्यंत लष्कर वेळोवेळी मदतीला धावून येते. आताही देशाच्या पूर्वोत्तर भागावर आलेल्या संकटाकडे लक्ष वेधत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सत्य सांगितले खरे. पण, लष्कर प्रमुखांच्या विधानामुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले, त्यांनी लगेच थयथयाट करायला सुरुवात केली. पूर्वोत्तरातील राज्यांना बांगलादेशाची सीमा लागून आहे आणि आसामसारख्या राज्यात लाखो बांगलादेशींनी अवैधपणे घुसखोरी केली आहे. आसामहे बांगलादेशी घुसखोरांसाठी जणू नंदनवनच! याला कारण इथल्या राजकीय पक्षांची आतापर्यंतची मतांच्या लाचारीपायी हाती कटोरा घेतलेली भूमिका. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र डोळ्यांत तेल घालून जागता पहारा देणार्या भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी याच मुद्द्यावर आपले रोखठोक मत मांडले, जे पुरोगामी बुद्धिजीवींना पचले नाही.
‘‘आसामसारख्या राज्यात बांगलादेशी घुसखोरीसाठी पाकिस्तान नियोजनबद्धरित्या प्रोत्साहन देत असून त्यामुळे संपूर्ण प्रदेश अशांततेकडे झुकू लागला आहे. मुस्लिमांची संख्या ईशान्य भारतात विशेषतः आसाममध्ये वाढू लागली आहे,’’ अशा शब्दांत लष्कर प्रमुखांनी धोक्याची कल्पना दिली. एवढेच नव्हे तर ‘‘१९८०च्या दशकात भाजप ज्या गतीने वाढला, त्यापेक्षा एआययूडीएफ हा पक्ष अधिक वेगाने वाढत आहे,’’ असा दाखला लष्करप्रमुखांनी दिला आणि पुरोगामी बुद्धिजीवींच्या कळपात भडका उडाला. लष्कर प्रमुखांनी भाजपचे नाव घेणे म्हणजे या लोकांच्या दृष्टीने महत्पापच. लष्कर प्रमुखांच्या तोंडून भाजपचे नाव ऐकताच त्यांच्यावर ही मंडळी टोळधाडीसारखी तुटून पडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने प्रवचने झोडणार्या ढोंगबाजांना लष्कर प्रमुखांनी आपल्या अभिव्यक्तीतून नियंत्रण रेषा ओलांडल्याचा साक्षात्कार झाला. कोणीतरी लष्कर प्रमुखांना जाब विचारलाच पाहिजे, असे म्हणत या लोकांनी मग बिपीन रावत यांना झोडपायला सुरुवात केली. पण, लष्कर प्रमुखांवर टीका करणार्या महाभागांना ते नेमके काय म्हणाले, याचा अर्थबोध तरी झाला का, याचीच शंका वाटते. कारण, देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रवादी भावना जागृत करणार्या विचारांशी दुरान्वयेही संबंध नसणार्या या बाळबोध लोकांना त्यांच्या विधानांतील गांभीर्य समजण्याची शक्यताच नाही. केवळ बेताल बडबड करणे, एवढीच त्यांची पात्रता. त्यामुळे त्यांनी आपापल्या वकुबानुसार लष्कर प्रमुख कसे चुकले हे सांगत त्यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली, पण प्रश्न फार मोठा आणि गंभीर आहे.
आसाममध्ये घुसखोरी करणार्या बांगलादेशींमध्ये मुस्लीम समाजाची संख्या सर्वाधिक आहे आणि याच अवैधपणे घुसखोरी करून राहत असलेल्या मुसलमानांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचा दावा करत कुराणच्या आयती वाचून पाण्यात फूक मारणारा माणूस म्हणजे बदरुद्दीन अजमल. भारतासह, अरब देशांतही आपला पिढीजात अत्तराचा व्यवसाय सांभाळणारा हा माणूस अशाप्रकारे गरीब, अज्ञानी आणि मागासलेल्या मुसलमान समाजातील लोकांच्या अडचणींची सोडवणूक करत असल्याची शेखी मिरवतो. अंधश्रद्धा पसरविण्याचा आरोप असलेल्या या बदरुद्दीन अजमलने २००५ साली ‘एआययूडीएफ’ नामक पक्षाची स्थापना केली. घुसखोरी करून आसाममध्ये अवैधपणे ठाण मांडून बसलेल्या बांगलादेशी मुस्लिमांना बदरुद्दीनने आपल्या झेंड्याखाली घेतले. त्यामुळेच या घुसखोरांना बदरुद्दीन अजमल म्हणजे आपला सुरक्षाकवचच वाटतो आणि बदरुद्दीनही त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करत आपली मतपेटी घुसखोरांच्या वाढत्या संख्येआधारे कशी वाढेल याची काळजी घेतो. आपल्या बर्या-वाईट कारवायांच्या जोरावर बदरुद्दीनच्या पक्षाने गेल्यावेळच्या निवडणुकीत इथे १३ आमदार आणि ३ खासदार निवडून आणले. आसाममध्ये पूर्वी मुस्लीमबहुल जिल्ह्यांची संख्या चार ते पाच होती, आता ती नऊपर्यंत वाढली आहे. शिवाय विधानसभेच्या १२६ पैकी ३९ ठिकाणी मुस्लीम समाजाची संख्या ३५ टक्के, तर २० ठिकाणी २५ ते ३० टक्के आहे आणि ही वाढलेली लोकसंख्या स्थानिक मुस्लीम समाजाची नव्हे, तर बांगलादेशातून अवैधपणे लाखोंच्या संख्येने येणार्या घुसखोर लोंढ्यांची आहे. ज्याच्या आधारे ‘एआययूडीएफ’ फोफावत आहे. स्थानिक लोकसंख्या संतुलनाच्या दृष्टीने हे निश्चितच धोकायदायक असून लष्करप्रमुखांनी त्याच्याकडेच लक्ष वेधले आहे. यात स्थानिक मुस्लिमांना विरोध नसून जे अवैध घुसखोरी करून आलेत त्यांना विरोध आहे, जे समजून घ्यायला हवे.
आसामसह पूर्वोत्तरातील बांगलादेशींच्या घुसखोरीला भारतद्वेषाच्या विखारावर पोसलेल्या पाकिस्तानची फूस मिळते. पण, आता त्या देशाने बांगलादेशींच्या घुसखोरीसाठी चिनी ड्रॅगनशी सख्य केल्याचे लष्करप्रमुखांच्या विधानावरून स्पष्ट होते. अरुणाचल प्रदेशचा घास घ्यायला टपून बसलेल्या चीनला पूर्वोत्तरातील राज्यांतही अशांतीच हवी आहे. त्यामुळेच सिक्कीमसह इतरही राज्यांत हातपाय पसरण्याची, आपले पाठीराखे पैदा करण्याचा त्याचा डाव असते. माओवाद्यांच्या जोडीला बांगलादेशी घुसखोरही अधिकाधिक प्रमाणात कसे भारतात शिरतील, यासाठी पाक आणि चीन नेहमीच प्रयत्न करतात. म्हणजे इथल्या मूळ लोकसंख्येच्या प्रमाणात घुसखोरांची संख्या वाढली की, आपले नापाक मनसुबे साधता येतील, असा हा कावा. बदरुद्दीन अजमलचा ‘एआययूडीएफ’ पक्ष याच घुसखोरांचे समर्थन करतो, त्यांच्या मतांच्या जोरावर निवडून येतो. त्यामुळेच या पक्षाची वाढ देशासाठी धोकादायक समजली पाहिजे. लष्करप्रमुखांच्या विधानाकडे या पार्श्वभूमीवरच पाहायला हवे. शिवाय या वाढत्या घुसखोरांमुळे काही प्रश्नही निर्माण होतात. आसाममधील मूळच्या भूमिपुत्रांची जे कोणत्याही धर्माचे असोत त्यांची लोकसंख्या कमी झाली तर? स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजीरोटीचे काय? त्यांचे रोजगारविषयक, पायाभूत सुविधाविषयक प्रश्न सोडवायचे की घुसखोरांच्या वस्त्यांचे? जे लोक परक्या देशातून येतात, त्यांच्यात भारतभूमीबद्दल आस्था, प्रेमअसेल का? युद्धकालीन परिस्थितीत त्यांची भूमिका नेमकी कोणती असेल? आणि हेच प्रश्न लष्करप्रमुखांनी वेगळ्या शब्दांत मांडले. पण, त्यांच्यावर टीका करणार्यांना त्यांनी घेतलेले भाजपचे नाव खुपले. परंतु, त्यामुळे आसाममधील वास्तव बदलेल का? की लष्करप्रमुखांनी मत मांडल्यामुळे घुसखोरीचा प्रश्न विचार वा उपाययोजना करण्यासारखा नाही? अवैध घुसखोरीची समस्या गंभीर की एखाद्या पक्षाचा उल्लेख महत्त्वाचा? याची उत्तरे आता खरे तर पुरोगामी बुद्धिजीवींनी द्यायला हवीत. पण, पाकिस्तान आणि चीनप्रेमाची भूमिका घेणारे ती उत्तरे देतील का?