मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ
मुंबई : राज्यातील जवळपास बांधकाम क्षेत्रातील २५ लाख कामगारांना अटल विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत बांधकाम कामगारांपैकी ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप मंडळाकडे नोंदणी केलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करता यावी याकरीता मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथे मिळून ९६ ठिकाणी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत २८ योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार असून हे अभियान २३ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. दरम्यान, बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी असे आवाहन कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी केले आहे.