माँ अन्नपूर्णा माता मंदिराने त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र परिपूर्ण : सुमित्रा महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : ‘‘त्र्यंबकेश्वरला अन्नपूर्णा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा मोठा योग आहे, आज शिवासोबतच शक्तीचेही मंदिर येथे प्रस्थापित झाल्यामुळे त्र्यंबक तीर्थक्षेत्र परिपूर्ण झाले आहे. यज्ञातून माणसाची मानसिक ताकद वाढते व ही ताकद एकत्रित होऊन शक्ती निर्माण होते. अशा एकत्रित शक्तीने देश बलवान होईल,’’ असा विश्वास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला.
 
त्या त्र्यंबकेश्वर येथील निलगिरी पर्वतावर साकारलेल्या माँ अन्नपूर्णा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. यावेळी मंचावर सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, खासदार हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, लक्ष्यचंडी यजमान कैलास घुले, प्राणप्रतिष्ठा यजमान अॅड. सुनील गुप्ता, जम्मूचे स्वामी हृदयानंदजी, वेरुळचे स्वामी हिरानंदजी, माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ समितीचे महामंत्री प्रदीप पटेल, कोषाध्यक्ष रतीश दशपुत्रे व मुख्य संयोजक शाम सिंगल आदी मान्यवर उपस्थित होते.
 
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वप्रथम लक्षचंडी यज्ञ स्थानास भेट दिली तसेच हवनकुंडाचे विधिवत पूजन करून त्यात आहुती दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते माँ अन्नपूर्णाच्या १९३१ किलो वजन असलेल्या पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यथासांग शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. या सोबतच ७५० कि.ग्रॅ. वजनाच्या सरस्वती देवीच्या मूर्तीची व ४७० किग्रॅ. वजनाच्या महाकाली मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
 
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज म्हणाले की, ’’माझे गुरू ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी प्रभानंद गिरिजी महाराज यांची इच्छा पूर्णत्वास गेल्याचा मला आनंद आहे. संसारात सर्वांनाच सदैव सुख शांती लाभो,’’ अशीही कामना त्यांनी केली. याप्रसंगी मंदिराचे निःशुल्क काम करणार्‍या अहमदाबादचे वास्तूविशारद सत्यप्रकाश यांचाही सत्कार करण्यात आला.
 
तसेच मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचेही लोकार्पण सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महामंडळेश्वर स्वामी सच्चिनानंद गिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद, आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित, स्वामी दिव्यानंद, स्वामी जयंद्रानंद, स्वामी नित्यानंद, स्वामी विजयानंद, पवन संघानिया, विलास ठाकूर, सुनंदा जाधव, सनातन शर्मा, मनोज जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
@@AUTHORINFO_V1@@