९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात पार पडले. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख या संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष होते. लक्ष्मीकांत देशमुखांची जी काही साहित्यनिर्मिती आहे तिच्या आधारावर ते ‘साहित्यिक’ म्हणून ओळखले जातात. गेली काही वर्षे साहित्य संमेलने त्यातल्या साहित्यिक चर्चांपेक्षा त्यातील वाद-विवादांमुळेच अधिक गाजली आहेत. यंदाही साहित्य संमेलन त्याला जागले. ज्यांना साहित्य संमेलनाविषयी कणव आहे, त्यांनी हल्ली साहित्य संमेलनात काय दर्जेदार ऐकायला मिळेल यापेक्षा ते कसे पार पडेल याचीच अधिक चिंता असते. साहित्य संमेलनातल्या वादांची नांदी खरेतर यापूर्वीच झाली होती. निमंत्रितांनी साहित्य परिषदेला येण्यासाठी मानधन मागू नये,अशी मागणीच पदाधिकार्यांनी केली होती. यातून जी नाराजी निर्माण झाली त्यातून कितीतरी उत्तम साहित्यिकांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याचे लक्षात आले. यापेक्षा मोठा वाद झाला तो विद्यमान अध्यक्षांच्या भाषणामुळे. ‘‘राजा तू चुकतो आहेस,’’ असे एक मोघम विधान लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. आपण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहोत. त्यामुळे काहीतरी खणखणीत विधान केले पाहिजे, हा त्यांचा पवित्रा संमेलन संपल्यावर पूर्णपणे बदलला. ‘‘आपण सर्वच पक्षातील लोकांना संबोधून असे म्हणालो होतो,’’अशी बुळचट विधाने करीत त्यांनी भाषणावर सारवासारव केली. आता देशमुख ठरले माजी सनदी अधिकारी. या मंडळींचे कधी, कसे आणि काय बाहेर पडेल हे काही सांगता येत नाही.
याचा अर्थ मराठीत कसदार साहित्य निर्माण करणारे साहित्यिक शिल्लक नाहीत, असे मुळीच नाही. लोक आहेत, उत्तमोत्तम लोक आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अशी मंडळी आपली साहित्यनिर्मिती करीत आहेत. मात्र त्यांना या साहित्य संमेलनाच्या गचाळ राजकारणात मुळीच रस नाही. श्रीपाल सबनीस नावाच्या इसमाने महाराष्ट्रात जो काही गोंधळ उडवून दिला होता तो पाहिला तर आधीच्या साहित्य संमेलनात ज्यांनी संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले होते त्यांना लाजच वाटली असेल. नंतर वर्षभर हे महाशय सतत काहीतरी बरळतच होते. आता आता कुठे माध्यमांना त्यांच्या विदुषकी चाळ्यात रस उरलेला नसल्याने त्यांच्या बातम्या येणे बंद झाले आहे. गेल्यावर्षी अक्षयकुमार काळे अध्यक्ष झाल्यानंतर यांचे साहित्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रसिकांना पुस्तकाची दुकाने गाठावी लागली होती. काहींना ती मिळालीसुद्धा परंतु साहित्याच्या प्रभावाचा आणि त्यातून समाजात घडून येणार्या मूल्यनिर्मितीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
साहित्य संमेलनासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान असेल ते मुक्तमाध्यमांवर अभिव्यक्त होणार्या नव्या लेखकांचे. त्यांचा बाज निराळा आहे. त्यांची शैली निराळी आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग कमावला आहे. त्यांच्यामागे छत्रचामरे घेऊन कुणीही उभे नाही. व्यासपीठावरच्या खुर्च्यांसाठीची तडफड त्यांच्यात नाही. कुणा पुढार्याने काही विचारले नाही तरी चालेल. त्यांचे त्यांचे उत्तम चालले आहे. त्यांचे दिवाळी अंक निघतात. त्यावर चर्चादेखील होतात. भोजनभाऊ संमेलनांना त्याचे काही घेणेदेणे नाही आणि या मंडळींनाही त्यांना हिंग लावून विचारावेसे वाटत नाही. आजच्या घडीला तुषार दामगुडे, अक्षय बिक्कड, शेफाली वैद्य, अक्षय जोग, प्रतीक कोसके अशी नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. खरेतर आता विद्रोही, आदिवासी अशी साहित्यसंमेलने होतात तसे पर्यायी साहित्य संमेलन घेणे आवश्यक झाले आहे. त्याशिवाय ही कोंडी फोडता येणार नाही.