भारत-पाकमधील मीडिया वॉर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018   
Total Views |
काश्मीर खोऱ्यात हिंसाराचाने पुन्हा थैमान घातले असून, सुरक्षा दळांचे आणखी जवान शहीद होत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरही पाकिस्तानी लष्कराच्या कारवाया वाढल्या असून, पाकिस्तानने युद्धबंदी उल्लंघनाचा जणू निर्णयच घेतला असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्कराने पाक चौक्यांविरुद्ध जबर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने त्यास उत्तर देत भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला. आजवर पाकिस्तानने ही मजल गाठली नव्हती. पाकिस्तान काश्मिरी अतिरेक्यांना हाताशी धरून आपल्या कारवाया चालवीत होता. मागील काही महिन्यांत भारतीय लष्कराने काश्मिरी अतिरेक्यांचा सफाया करण्याचे धोरण राबविल्यानंतर पाकिस्तानच्या थेट कारवायांमध्ये वाढ झाली असल्याचे मानले जाते. पाकिस्तानच्या कारवायांना भारताकडून चोख उत्तर दिले जाणे सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने एक पाऊल पुढे टाकीत उखळी तोफांचा वापर करणे सुरू केले आहे. भारत-पाक सीमेवर घडत असलेल्या हिंसाचारात ही एक नवी घटना असल्याचे मानले जाते.
 
जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसाचारात आणखी एक नवी बाब आढळून आली आहे. काश्मीर खोऱ्यात जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या संघटना हिंसाचार घडवून आणीत होत्या. मात्र त्यांचे आपसात पटत नव्हते. प्रथमच त्या समन्वयाने काम करीत असल्याचे भारतीय सुरक्षा दळांना आढळून आले आहे. जम्मू - काश्मीरमध्ये लागोपाठ दोन अतिरेकी हल्ले झाले. त्यातील एकाची सूत्रे जैश-ए-मोहम्मदकडे होती तर दुसèयाची सूत्रे लष्कर-ए-तोयबाकडे होती. भारतासाठी ही बाब चांगली मानली जात नाही. आयएसआयने पुढाकार घेत, दोन्ही संघटनांमध्ये समन्वय घडवून आणला असल्याचे मानले जाते.
एक कारण हेही
 
काश्मीर खोऱ्यात घडत असलेल्या घटनांसाठी वेगवेगळे घटक कारणीभूत असले तरी यासाठी आणखी एक घटक कारणीभूत असल्याचे मानले जात होते. प्रथमच त्याचा उल्लेख जम्मू-काश्मीरसाठी केंद्र सरकारतर्फे नेमण्यात आलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांनी केला आहे. तो घटक म्हणजे प्रसारमाध्यमे, विशेषत: चॅनेलवाल्यांची भूमिका.
 
काश्मीर खोऱ्यात एखादी हिंसक घटना घडली की, ‘चॅनेलवाले ‘ पाकिस्तानको घर में घुसकर मारो‘ असा शो करतात आणि त्याचे परिणाम पाकिस्तानातही उमटतात. काश्मीर खोऱ्यातील घटनाक्रम एखाद्या युद्धासारखा आहे. त्याचे गंभीर आकलन-विश्लेषण व त्याला प्रतिसाद देणे ही सुरक्षा दळांची जबाबदारी असते. त्यात टी.व्ही. स्टुडियोत बसून, ‘घर में घुसकर मारो‘ ही भाषा योग्य ठरत नाही. दुर्दैवाने याचा परिणाम जनतेवर होतो, सरकारवर होत आहे आणि पाकिस्तानवरही होत आहे. ‘घर में घुसकर मारो’ला पाकिस्तानही प्रतिसाद देत आहे. काश्मीर खोऱ्यात मागील दीड महिन्यात २४ भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्ताननेही, घर में घुसकर मारो हे धोरण स्वीकारल्यासारखे दिसते.
 
चित्र बदलले
जगाचा विचार केला तरी आता, पूर्वीसारखे युद्ध होण्याचे चित्र बदलले आहे. युद्धाची परिभाषा बदलली आहे. भारताजवळ १५ लाख सैन्य आणि पाकिस्तानजवळ फक्त ५ लाख सैन्य या बाबी आता गौण झाल्या आहेत. भारतीय सैन्य जगातील एक सर्वात चांगले सैन्य मानले जाते. मात्र, पाकिस्तानचे सैन्यही कमी दर्जाचे मानले जात नाही. भारताचे हवाई दल चांगले आहे. पाकिस्तानचे हवाई दलही तोडीचे मानले जाते. भारतात, महिला वैमानिकांना लढावू विमान हाताळण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील महिला वैमानिकांना लढावू विमाने हाताळण्याची परवानगी भारतापूर्वी देण्यात आली आहे. अशा स्थितीत टी.व्ही. स्टुडियोत बसून, घर में घुसकर मारो अशी भाषा काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती चिघळण्याचे एक कारण ठरत आहे.
 
योग्य निर्णय
भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चा तिसऱ्या देशात आणि गोपनीय पद्धतीने केली जात आहे. मोदी सरकारचा हा निर्णय अगदी योग्य आहे. कारण, भारतात अशी चर्चा झाली तर तर चर्चा सुरू होण्यापूर्वीच चॅनेलवाले कॅमेरे लावून बसलेले दिसतील आणि चॅनेलवरून केले जाणारे वृत्त की भाषण वस्तुस्थितीशी एवढे विसंगत असते की चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्या चर्चेला सुरुंग लागलेला असेल. विशेषत: ज्या शक्तींना असा सुरुंग लावावयाचा असतो ते तयार बसलेलेच असतात. म्हणजे, ‘सबसे तेज’ साठी चॅनेलमध्ये दिसणारी कायम स्पर्धा व भारत-पाक संबंधात कायम तणाव असणाऱ्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या लॉबी यांच्यात नकळत युती होते आणि त्याचे परिणाम नंतर दिसू लागतात.
 
आणखी एक निष्कर्ष
चॅनेलवाल्यांमुळे काश्मीर खोऱ्यातील स्थिती बिघडत आहे असा आणखी एक अभिप्राय काही नेत्यांनी दिला होता, जो योग्य आहे. एकीकडे काश्मिरी जनतेला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सर्वांना मान्य आहे. मात्र त्याच वेळी चॅनेलवरून काश्मिरी जनतेला गद्दार, राष्ट्रविरोधी ठरविले जाते. काश्मीर खोऱ्यातील सर्वच जनता पाकिस्तानच्या बाजूने वा भारताच्या विरोधात नाही. पण, चॅनेलची भाषा ऐकल्यानंतर तेही भारताच्या विरोधात भूमिका घेतात.
 
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी यांचे संयुक्त सरकार आहे. राज्यातील निवडणुकीनंतर जे राजकीय चित्र तयार झाले, त्यातून दोनच पर्याय समोर येत होते. एक तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे वा भाजपा-पीडीपी यांनी आपसातील मतभेद बाजूला सारून सरकार स्थापन करणे. राष्ट्रपती राजवट लावली जाणे पाकिस्तानच्या हिताचे ठरले असते. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होऊनही काश्मिरी जनतेला सरकार मिळाले नसते. याचा फायदा पाकिस्तानने उठविला असता. भाजपा व पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सरकार स्थापन करण्याचा योग्य निर्णय घेतला. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना काश्मिरी जनतेला सांभाळावयाचे आहे. त्यांना काश्मिरी जनतेची भाषा बोलणे भाग आहे. त्यामुळे त्यांच्या एखाद्या विधानाचा वापर करून दररोज भाजपा-पीडीपी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे ठरत आहे.
 
अपरिपक्व भूमिका
चॅनेलवाले आपल्या अपरिपक्व भूमिकेतून, भारत-पाक संबंधात युद्धज्वर तयार करीत असल्याचे म्हटले जाते. सीमेवर एखादी घटना घटल्यानंतर, ‘अब तो जागो मोदी सरकार’ असे म्हणत भारताने ताबडतोब युद्ध सुुरू करावे असे वातावरण तयार केले जाते. युद्धाचा निर्णय घेणे किती अवघड व जोखमीचा आहे हे सरकारच समजू शकते. चॅनेलच्या स्टुडियोत बसून, युद्धाचे भाषण देणाऱ्या ‘अँकर’ला ते समजू शकत नाही. एखाद्या चॅनेलचा स्टुडियो अमृतसर शहराच्या सीमेवर असता तर बहुधा त्या चॅनेलने ‘अब तो जागो मोदी सरकार’ अशी मागणी केली नसती. कारण, त्याचा पहिला परिणाम आपल्या स्टुडियोवर होईल हे त्यांच्या लक्षात आले असते.
 
प्रसिद्ध पत्रकार स्व. एम. व्ही. कामत यांनी एकदा म्हटले होते, पत्रकारितेत काय लिहावयाचे यापेक्षा, काय लिहू नये हे अधिक महत्त्वाचे असते. दुर्दैवाने चॅनेलवाल्यांना हे सांगणारा आज कुणी दिसत नाही. किंबहुना, जे दाखवयाचे नाही तेच जास्त दाखविण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू दिसते. त्यातूनच, घर में घुसकर मारो ची भाषा सुरू होते आणि त्याचे परिणाम काश्मीर खोऱ्याला, भारतीय जवानांना भोगावे लागतात. भारत-पाक यांच्यातील हे अघोषित मीडिया वॉर अधिक गंभीर आहे ते यासाठी.
@@AUTHORINFO_V1@@