लहानपणापासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या रमेश सावंत यांना काही कारणामुळे अंधत्व आले, त्यानंतर ते सुमारे पाच ते सात वर्षे अंथरुणाला खिळून होते. त्यानंतर त्यांचा ‘सक्षम’ संस्थेशी संबंध आला व ते संस्थेच्या कामात गढून गेले. संस्थेच्या माध्यमातून अंध-अपंगांना सहकार्य, मदत, अवयवदाते मिळवून देणे, दाता आणि ज्याला अवयवांची गरज आहे, अशा व्यक्तींमधील दुवा म्हणून त्यांनी काम सुरु केले. यासाठी त्यांनी अनेकदा प्रवास केला. या माध्यमातून त्यांचा असंख्य लोकांशी संपर्क आला. अनेक लोकांशी ते जोडले गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी चरितार्थासाठी पीसीओ केंद्र देखील चालवले. सध्या त्यांनी रेल्वेतील फेरीवाल्यांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या १५ वर्षांतील त्यांच्या या एकूण कार्याची दखल घेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधीलकी जपल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र त्यांनी “हा पुरस्कार मला नको,’’ असे म्हणत अन्यही काही लोकांची नावे सुचविली व आपल्या निरपेक्ष समाजकार्याची पावती दिली.