कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती
१०२ तालुक्यांमधील ३७२४ गावांचा समावेश
मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे संपूर्ण राज्यातील एकूण तीन लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिली आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याविषयी माहिती दिली असून बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले असून राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांना या पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे, असे फुंडकर यांनी सांगितले. या १९ बाधित जिल्ह्यांमधील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३ हजार ७२४ गावांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार या सर्व जिल्ह्यांमधील एकूण २ लाख ९० हजार ३६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असे फुंडकर यांनी सांगितले. तसेच यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.