आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्याकडून दखल
महा एमटीबी इम्पॅक्ट
मुंबई : पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले माजी सैनिक दत्ता थापड यांच्यावरील अन्याय दूर होणार आहे. २००० साली थापड हे लष्करातून निवृत्त झाले होते. मात्र, त्यांना गेली अठरा वर्षे भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि इतर सुविधांचा लाभ मिळत नव्हता. 'भारतीय सैन्यदलात शौर्य गाजवणा-या जवानाची उपासमार' या मथळ्याखाली दि. १३ फेब्रुवारी रोजी याबाबत महा एमटीबीमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या आर्थिक लाभांपासून वंचित राहिल्यामुळे आजारपणात पैशांअभावी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. गेले अठरा वर्षांपासून थापड हे आपल्याला सर्व लाभ मिळावे यासाठी संघर्ष करत होते. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून न्याय देण्याची मागणी केली होती.
तसेच आपल्याला कोणतेही लाभ मिळत नसून आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याचे थापड यांनी म्हटले होते. तसेच आपल्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली होती. याबाबत महा एमटीबीमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सावरा यांची त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच थापड यांची परवड थांबवण्यासाठी त्यांना पेन्शन आणि अन्य लाभ देण्यात यावेत, यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांना पत्र पाठवण्याची विनंती सावरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.