यवतमाळ : देशाच्या प्रगतीसाठी देशातील नागरिक सुशिक्षित होणे हे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणाच्या बळावरच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे देशातील यशस्वी पिढी निर्माण करणे ही शिक्षकांची मुख्य जबाबदारी असते, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा सभागृहात माणुसकीचा हात उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी आयोजित “ अभियानातून शिक्षण : एक ज्ञानरचनावाद” या कार्यक्रमात ते बोलत होते.
शिक्षण हा तर राष्ट्राचा आत्माच आहे. शिक्षक हा नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल, तो गुरगुरतो, असे सांगितले आहे. त्यामुळे सक्षम पिढी घडविण्यासाठी आज गुरगुरणा-या शिक्षकांची गरज आहे, असे ते म्हणाले. तसेच सुरुवातीच्या काळात जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमधून मुले घडली. यात शिक्षकांचा वाटा मोठा आहे. अभियानातून अध्यापन या संकल्पनेनुसार समाजात सकारात्मक पिढी घडावी, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, प्रख्यात व्याख्याते वसंत हंकारे, न.प. शिक्षण सभापती नीता केळापूरे, नगरसेविका माया शेरे, कीर्ति राऊत, नगर पालिका प्रशासन अधिकारी योगेश डाफ, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, डॉ. सुचिता पाटेकर, डॉ. नितीन खर्चे आदी उपस्थित होते.