ध्यानी ‘मणि’ पाकप्रेम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |

 


 
 
 
 
 
 
लोकांच्या नजरेत भरेल असे कोणतेही शाश्वत, चिरंतन कार्य करण्याची पात्रता अंगी नसली की, मग भडक वक्तव्ये करत चर्चेत राहण्याची थेरं केली जातात. मणिशंकर अय्यर हे या जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मुकुटमणी!
 
 

“मी पाकिस्तानवर प्रेम करतो. कारण मी भारतावरही प्रेम करतो. भारताने आपल्या शेजारी देशावर प्रेम केले पाहिजे,’’ असा उफराटा सल्ला मणिशंकर अय्यर या काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या भणंगाने दिला. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहणारा तमासगीर म्हणजे मणिशंकर अय्यर. लोकांच्या नजरेत भरेल असे कोणतेही शाश्वत, चिरंतन कार्य करण्याची पात्रता अंगी नसली की, मग भडक वक्तव्ये करत चर्चेत राहण्याची थेरं केली जातात. मणिशंकर अय्यर हे या जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मुकुटमणी! आपल्या तोंडातून गटार ओकत राहण्याची कला मणिशंकर अय्यर यांनी अगदी सुरुवातीपासून अवगत केल्याचे दिसते. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी होते. वाजपेयी यांच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वासमोर मणिशंकर अय्यर म्हणजे काँग्रेसच्या थोड्याबहुत नावावर पोसलेले बांडगुळच! कारण, गांधी-नेहरू परिवार भक्तीपरायण असलेला जीव म्हणजे मणिशंकर अय्यर! घराण्याची गुलामगिरी हीच त्यांची ओळख! तर याच अय्यरांनी तेव्हा अटलजींनानालायकम्हणण्याचा उद्दामपणा केला. केवळ भाजप, संघ आणि राष्ट्रवादी शक्तींविषयी मनात अफाट द्वेष भरलेला असल्यानेच मणिशंकरांनी अटलजींवर अश्लाघ्य भाषेत थुंकण्याचा उपद्व्याप केला आणि आज त्याच मणिशंकर अय्यरांचे पाक प्रेम ऊतू जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

 
 

पाकिस्तानवरील प्रेम जगजाहीर करण्याची मणिशंकर अय्यर यांची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही आपल्या पाकप्रेमाची कबुली वेळोवळी केलेल्या वक्तव्ये आणि कृतीतून दिलेली आहेच. सध्या जगभर प्रेमाचा मौसम सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांतून, समाजमाध्यमातून आणि आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटनांतून दिसते. पण, मणिशंकर अय्यरांची कथाच न्यारी! त्यांनी थेट पाकिस्तानसारख्या अखंड भारतद्वेषावर उभ्या असलेल्या देशावरच प्रेम असल्याचा दावा केला, शिवाय आपल्या या प्रियतमावर भारतासह इथल्या नागरिकांनीही प्रेम करावे, असा शहाजोग सल्लाही दिला. पण, मणिशंकर अय्यरांना हे ठणकावून सांगावेसे वाटते की, ज्या देशाला आपल्या जन्मापासून फक्त भारतीयांच्या रक्ताचीच चटक लागलेली आहे, ज्या देशाने आजपर्यंत भारतमातेच्या हजारो वीरपुत्रांचा बळी घेतला, ज्या देशाने काल-परवापर्यंत भारतातील शेकडो निष्पापांचा जीव घेतला, त्या देशावर इथला सच्चा देशभक्त कधीही प्रेम करू शकत नाही! तर पाकिस्तानच्या नापाक कारवायांपायी ज्यांना बलिदान द्यावे लागले, ज्यांच्या घरातले कर्ते-धर्ते गेले त्यांच्या डोळ्यातील अश्रू ज्यांना दिसत नाही, अशी उलट्या काळजाची मंडळीच त्या देशावर प्रेम करू शकतात, अन्य कोणीही नाही! गेल्या कितीतरी वर्षांपासून पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्याचे धोरण अवलंबले आहे.

 
 
९०च्या दशकात याच पाकिस्तानच्या धोरणामुळे जम्मू-काश्मिरात दहशतवादाचा राक्षस उदयास आला. पाकच्या सर्वप्रकारच्या रसद पुरवठ्यामुळे या राक्षसाने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याचे जगाने पाहिले. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यांनी काश्मीरचे जनजीवन विस्कळीत झाले, तिथली शांतता लोप पावली, लाखो काश्मिरी पंडितांना तिथून पलायन करावे लागले. मुंबई, दिल्ली, गुजरात आणि देशातल्या कित्येक ठिकाणांवर याच पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी थैमान घातले. देशाचा मानबिंदू असलेल्या संसदेवर पाकिस्तानच्याच पाठिंब्याने हल्ला करण्यात आला. पठाणकोट, उरी आणि कालपरवा सुंजवानातही याच देशाच्या समर्थनातून दहशतवादी हल्ले झाले. पण, या सर्व हल्ल्यांच्यावेळी मणिशंकर अय्यर हा पाकिस्तानचा प्रियकर कुठल्या बिळात लपून बसला होता? त्याने आपल्या प्रिय देशाला भारतावर हल्ला करण्याची शपथ का घातली नाही? दिवसाढवळ्या सीमेपलीकडून घुसखोरी केली जाते, शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते, त्यावेळी मणिशंकर अय्यरांनी आपल्या प्रियतमाकडून भारताच्या कुरापती काढण्याचे वचन का घेतले नाही? पाकिस्तानने भारतावर एक-दोन नव्हे, तीन युद्धे लादली त्यावेळी मणिशंकर अय्यर कुठल्या प्रेमाची कबुतरे उडवित होते? हे प्रश्न विचारावेच लागतील आणि त्यांची उत्तरेही मणिशंकरांना द्यावी लागतील आणि जर मणिशंकरांकडे त्यांची उत्तरे नसतील तर त्यांनी आपल्या प्रिय देशातल्या बगलबच्च्यांनाही हे विचारावे, पण इथल्या तमाम देशप्रेमी नागरिकांचे कुतूहल मात्र शमवावे.
 
 
मणिशंकर अय्यर यांचे जन्मठिकाण म्हणजे पाकिस्तानातील लाहोर शहर. पाकिस्तानात त्यांचे नेहमीच येणे-जाणे असते. पंचतारांकित चर्चेच्या मैफिलींचे आयोजन करायचे आणि तिथून फुकटचे सल्ले द्यायचे, हा त्यांचा आवडता उद्योग. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष नसानसात भिनलेला हा मनुष्य. २०१४ साली लोकसभा निवडणुकीवेळी या इसमाने मोदींना चायवालाम्हणत हिणवले. पण मोदींनी त्यांचीचचायवालाम्हणून केलेली हेटाळणी उचलून धरतचाय पे चर्चाकार्यक्रमाचे आयोजन करत काँग्रेसला आसमान दाखवले. २००४ साली याच माणसाने शेकडो क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या सावरकरांनी तिथे तुरुंगात असताना अनेकानेक कविता रचल्या, पण डोक्यात द्वेषाचे विष भिनलेल्या मणिशंकर अय्यरांनी त्यांच्या कविता तेथून खोडून काढल्या, हटवल्या. अशी ही निलाजरी आणि केवळ एका घराण्याने टाकलेल्या तुकड्यावर पोसलेली व्यक्ती. २००० साली त्यांनी मुलायमसिंह यादव यांच्याबाबतही असेच वादग्रस्त विधान केले. ‘‘मुलायमसिंह माझ्यासारखे दिसतात कारण माझे वडील एकदा उत्तर प्रदेशला गेले होते, त्यांच्या आईंना विचारा,’’ अशा शब्दांत त्यांनी आपली लायकी दाखवली होती. गुजरात निवडणुकीवेळी याच मणिशंकर अय्यर यांनी आपल्या घरी मेजवानीचे आयोजन करत पाकिस्तानी बोलभांडांना चर्चेचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी ‘‘पाकिस्तानला शांतता हवी असेल, तर भाजपला हटवून काँग्रेसला सत्तेवर बसवा,’’ अशी विनवणी केली. भारतातल्या कित्येक दहशतवादी हल्ल्यांत हात असलेल्या कुख्यात दहशतवादी हाफिज सईदलाहाफिजसाहेबम्हणण्याचा प्रतापही याच माणसाच्या नावावर आहे. आता तर त्यांनी पाकिस्तानवरील प्रेमाचीच जाहीरपणे वाच्यता केली. पण, भारतमातेचा सुपुत्र कुलभूषण जाधव याच पाकिस्तानच्या काळकोठडीत आयुष्य कंठत आहे. त्यांच्या आई आणि पत्नीची कपाळावरील कुंकू पुसून, गळ्यातील मंगळसूत्र काढायला लावून, पायातल्या चपला काढून याच पाकिस्तानने अवहेलना केली. पण, त्यावेळी मणिशंकर अय्यर यांनी याविरोधात आपल्या प्रिय देशासमोर एकदाही दात उघडल्याचे समोर आले नाही की कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्याचे दिसले नाही. त्यामुळे अशा पाकप्रेमाची लागण झालेल्या किडीपासून सुटका होणे, हीच भारताची आजची गरज आहे, असेच म्हणावे लागेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@