शैक्षणिक सुधारणांमुळे राज्य तिसर्‍या स्थानावर : विनोद तावडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |

शिक्षकांना निवडणूक कामांमधून वगळण्याचे निर्देश

  

नाशिक : राज्यात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक सुधारणांमुळे महाराष्ट्र राज्य देशात तिसर्‍या क्रमांकावर आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.
 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ’शिक्षणाची वारी’ कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणमंत्री तावडे बोलत होते. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, नरेंद्र पवार, शिक्षण संचालक सुनील मगर, उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, नितीन उपासनी तसेच प्रदीप पेशकार, संदीप झा आदी उपस्थित होते.
 
यावेळी तावडे म्हणाले, ’’ प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही कौशल्य दडलेले असते. ते शोधण्याची गरज आहे. यामुळे शालान्त परिक्षेत अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निकालानंतर लगेचच पुन:परिक्षा घेणे, गुणपत्रकावर नापास हा शेरा टाकण्याऐवजी ‘इलिजेबल फॉर स्कील डेव्हलपमेंट’ (कौशल्य विकासासाठी पात्र) शेरा देणे असे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, ’’शाळांमधील शैक्षणिक सुधारणांमुळे २५ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधून काढून मराठी शाळांमध्ये पाठविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांना टेक्नोसेव्ही बनविल्यामुळे १ लाख २१ हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविताना तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून कर्तृत्वासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग केला आहे. शिक्षकांवरील शाळाबाह्य कामाचा ताण कमी व्हावा यासाठी निवडणूक कामांमधून वगळण्यात यावे, असे निर्देश देण्यात आल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
 
या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिक्षकांमध्ये जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच सुचविण्यात आलेल्या नवीन संकल्पनांचा शासनाच्या धोरणंमध्ये समावेश करण्यात येईल, असेही मंत्रिमहोदयांनी सांगितले.
 
शिक्षणाची वारी
  
’शिक्षणाची वारी’ कार्यक्रमासाठी शिक्षण पद्धतीमध्ये राबविलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे, उपक्रमांचे ५५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री तावडे यांनी स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. ’शिक्षणाची वारी’ कार्यक्रमांतर्गत २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत नाशिकसह विविध जिल्ह्यांमधील शिक्षक सहभागी होणार आहेत. यामध्ये पालघर, ठाणे, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, मुंबई, मुंबई उपनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@