नागरिकांनी कर्तव्य समजून अहिंसेचा अवलंब करावा - डॉ. अरुण गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |

‘भाऊंचा कट्टा’ उपक्रमात म. गांधीजींच्या नातवाने उलगडले अहिंसा तत्त्व

 
 
 
जळगाव : 
 
अहिंसेच्या मार्गावर चालत भारत जगाला प्रेरणादायी ठरेल असे स्वप्न महात्मा गांधी पाहात होते आज मात्र ते केवळ स्वप्नवतच आहे. महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणायचे असेल तर भारतातील नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य समजून घ्यायला हवे.
 
तसे झाल्यास नक्की भारत अहिंसामार्गाने जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास महात्मा गांधींचे नातू डॉ. अरुण गांधी यांनी व्यक्त केला.
 
जैन हिल्स येथे आयोजित ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमात दुसरे विचारपुष्प गुंफतांना ते बोलत होते. व्यासपीठावर गांधीतीर्थचे विश्वस्त सेवादास दलुभाऊ जैन, तुषार गांधी होते. यावेळी प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या ‘कस्तुरी गंध’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील करण्यात आले.
 
या कार्यक्रमात डॉ. अरुण गांधी यांचे स्वागत सेवादास दलुभाऊ जैन यांनी केले. यावेळी भूमिका मांडताना डॉ. अरुण गांधी म्हणाले की, मी लहान होतो त्यावेळी माझे आजोबा महात्मा गांधी यांच्याकडून छोट्या-छोट्या प्रसंगातून कसे शिकायला मिळाले ते सोदाहरण सांगितले.
 
शारीरिक आणि विचारांची हिंसा या दोन प्रकारांच्या हिंसेची यादी त्यांनी बनवायला सांगितली होती. दैनंदिन जीवनात आपल्याकडून किती मोठी हिंसा होते हे या यादीवरून मला शिकायला मिळाले.
 
 
आपण शारीरिक हिंसा करण्याचे प्रमाण कमी असून मानसिक पद्धतीची हिंसा मोठ्या प्रमाणावर करतो असे लक्षात आले. मानसिक हिंसेला अहिंसेत रुपांतरीत केले तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते.
 
 
याचे उदाहरण देताना त्यांनी अमेरिकेत वर्षाला अब्जो डॉलर्सचे अन्न वाया घालविले जाते, फेकले जाते हीदेखील नैसर्गिक हिंसा आहे, असे सांगितले.
डॉ. विश्वास पाटील यांच्या ‘कस्तुरी गंध’चे प्रकाशन
 
प्रसिद्ध लेखक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी कस्तुरबा यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेली कादंबरी ‘कस्तुरी गंध’चे प्रकाशन डॉ. अरुण गांधी, तुषार गांधी आणि सेवादास दलुभाऊ जैन यांच्याहस्ते करण्यात आले.
 
 
गांधी तीर्थचे सहकारी अश्विन झाला यांनी डॉ. पाटील यांचा परिचय करून देऊन पुस्तकाबद्दल सांगितले. डॉ. पाटील यांनी पुस्तकातील दहा वर्षांचे लहान डॉ. अरुण गांधी व कस्तुरबा यांच्या एका प्रसंगाचे अभिवाचन केले.
@@AUTHORINFO_V1@@