भुसावळला बहिणाबाई महोत्सवानिमित्त पत्रपरिषदेत प्रतिपादन
भुसावळ :
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 8 ते 12 दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन गुरुनाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील व तालुक्यातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध होवून महिलांना स्वावलंबी करून बहिणाबाईंचे विचार घरोघरी पोहोचवून त्यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले.
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 6 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी खा. रक्षाताई खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पं.स.सभापती प्रीती पाटील, पं.स.सदस्या वंदना उन्हाळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना आ. खडसे म्हणाले की, गत चार वर्षांपासून जळगाव येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येत होता. मात्र यंदा भुसावळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून येथे लाखो रुपयांची उलाढाल होणार असून जवळपास तीनशेच्यावर बचतगटांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे.
गरजू महिलांना या माध्यमातून रोजगार मिळणार असून अशा कार्यक्रमातून महिलांना संधी व प्रोत्साहन मिळते. या महोत्सवात जवळपास 40 विविध क्षेत्रातील महिलांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन, जादूचे प्रयोग यासह आदर्श शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम, खान्देशची लोकधारा हा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. या कार्यक्रमात 75 स्थानिक कलाकार राहणार आहेत.
तसेच शहरातील 1 हजार विद्यार्थिनी या एका तालासुरात बहिणाबाईंच्या कवितांचे गायन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ना.गिरीश महाजन, मध्य प्रदेशच्या मंत्री ना.अर्चना चिटणीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ना.दिलीप कांबळे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील हे उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ. खडसे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी प्रा. डॉ. सुनिल नेवे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी मांडली. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी हे नाव देण्यात आ. खडसे यांची भूमिका अतिशय महत्वाची होती. त्याच पाश्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खा. रक्षाताई खडसे यांनीसुद्धा माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लहानांपासून मोठ्यांसाठी कार्यक्रम होणार आहे. तसेच बहिणाबाईंच्या जीवनावर आधारित पोस्टर प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील ज्या महिलांनी उत्कृष्ट कार्य केले आहे, त्या महिलांना या कार्यक्रमात आमंत्रित केले असून त्यांचे मार्गदर्शन महिलांना लाभणार आहे. तसेच महोत्सवात दररोज बक्षिसाचे लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या महोत्सावाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शैलजा पाटील, सविता अहिरे, राजेंद्र नाटकर, रमेश नागराणी ,वसंत पाटील, प्रमोद सावकारे, बोधराज चौधरी,गिरीश महाजन, मनीषा पाटील, विनिता नेवे, किरण कोलते, किशोर पाटील, अनिकेत पाटील, पिंटू ठाकुर,गोलू पाटील, सुनिल महाजन, दिनेश नेमाडे, राजेंद्र चौधरी, रामचंद्र तायडे ,ऍड.विजय खडसे, नीना कटलर, प्रशांत पाटील, प्रशांत निकम,अनिता नेवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजेसाठी पक्षाने वापर करून घेतल्याची आ. खडसे यांची खंत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून आ.एकनाथराव खडसे यांना भाजपाने बाजूला सारल्याचे सांगितले होते.
याबाबत त्यांना विचारले असता,
त्यांच्या मताशी सहमत असून उद्धव ठाकरे खरे बोलले असून 40 वर्षे पक्ष सेवा केल्याचे बक्षीस मिळाले आहे. गरज होती तेव्हा पक्षाने वापर करून घेतला असल्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
ते बहिणाबाई महोत्सव तयारी निमित्त भुसावळ येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. आ.खडसे म्हणाले की, वापर करून घेतला तरी दिव्याची वात मजबूत असून अंधार पडला की दिव्याची वात पेटून प्रकाश देते.
धुळे मनपा निवडणुकीत पक्षाने काही गुंडांना प्रवेश देऊन उमेदवारीही दिली. याबाबत विचारले असता खडसे म्हणाले,पक्षाने वाल्याचा वाल्मिकी करावा पण लक्षात ठेवा पक्ष वाल्या बनू नये याची काळजी घ्यावी. मी सत्तेसाठी लाचार नसून सत्ता आणणार्यांमधून आहे. रामालाही वनवासात जावे लागले होते, मात्र समय बलवान आहे. तरीही पक्षाच्या विरोधात काम करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.