नवी दिल्ली : हवा प्रदूषणाबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या प्रदूषित हवेमुळे देशात प्रत्येक आठजणांपैकी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर बाहेरील वातावरणासोबतच घरातील हवादेखील प्रदूषित असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. चिंतेची बाब म्हणजे, या अहवालानुसार देशात हवा प्रदूषणाने सीमा गाठली असून यामुळे आपल्या शरीरावर तंबाखूपेक्षाही जास्त परिणाम होत आहेत.अशाप्रकारचा प्रथमच आपल्या देशात अभ्यास झाला असल्याची माहिती आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था जगातील सर्वात प्राचीन वैद्यकीय संशोधन संस्था आहे. हवेतील प्रदूषणाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठीआयसीएमआरने संशोधन केले होते. यानंतर आयसीएमआरने सादर केलेल्या या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. २०१७ मध्ये देशात हवा प्रदूषणामुळे तब्बल १७.४ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे देखील या अहवालामुळे समोर आले आहे. तर देशातील या प्रदूषित हवेचा तब्बल ७७ टक्के नागरिकांना फटका बसत आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार एक लाख लोकांपैकी ६२ लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो, तर ४९ लोकांचा मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे वाढत्या प्रदूषित हवेचे किती गंभीर स्वरूपाचे परिणाम आहेत. हे दिसून येते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/