डोंबिवली : भारतात प्रत्येक जोडप्याला विवाह नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्याकरिता प्रत्येक शहरात विवाह नोंदणी कार्यालयही उभे करण्यात आले. या नोंदणीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागातही या सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र या विभागात आठवड्यातून केवळ दोनच दिवस विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विवाह नोंदणी करणाऱ्या विवाहितांची आणि साक्षीदारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, एकाचवेळी काम होत नसल्याने या विवाहितांची चांगलीच फरफट होत आहे.
कडोंमपातर्फे विवाह नोंदणीसाठी बुधवार व गुरुवार असे आठवड्यांतून दोन दिवस देण्यात आले आहेत. विवाह नोंदणीसाठी एक विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. हा अर्ज नवविवाहितांनाच दिला जातो, त्यानंतर हे अर्ज स्वीकारताना काही त्रुटी राहिल्यास पालिकेचे कर्मचारी मदत न करता पुन्हा येण्यास सांगतात. तसेच, या नोंदणीसाठी पती-पत्नी सोबत प्रत्येकी दोन असे एकूण चार साक्षीदार घेऊन यावे लागतात, मात्र या विभागात एवढी माणसे बसतील अशी सोयही नाही. तसेच, तेथे काम करणारी एकच महिला कर्मचारी असून त्या नागरिकांशी सौजन्याने वागत नसल्याने पालिकेच्या कारभाराबाबतही नागरिकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आले आहे. एवढ्या तक्रारी येऊनही असंवेदनशील असलेल्या प्रशासनाने या तक्रारींची दखलही घेतलेली नाही वा कोणतीही कार्यवाही अद्याप केलेली नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/