मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने एसटी महामंडळाने युवकांना चालक, वाहक पदाची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक वाहक पदाच्या ४२४२ पदांची भरती करण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड,उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. यापैकी ११ जिल्ह्यात ४२४२ पदांच्या रिक्त जागा असून बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक, वाहक पदांच्या जागा रिक्त नाही. या जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड करुन ज्या जिल्ह्यात जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त्या करण्यात येईल. तसेच इतर आरक्षणासोबत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ही एसटी महामंडळाने घेतला आहे.
ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी काम करता येईल. यात १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा विकल्पही स्वीकारता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/