मुंबई : मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक 'पद्मश्री' नाना चुडामासा यांचे वृद्धापकाळाने रविवारी पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. नाना चुडामासा हे भाजप नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांचे वडील होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले असल्याचे त्यांच्या जायंट्स संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
मुंबईचे माजी नगरपाल तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेले काम अजूनही जनतेच्या स्मरणात आहे. नगरपाल असताना त्यांनी " आय लव यु मुंबई" ही मोहीम सुरू केली होती. मुंबईतल्या सर्व स्तरावर ही मोहीम अतिशय लोकप्रिय ठरली होती. मुंबईच्या झोपडपट्टी भागात ही स्वच्छतेचा आणि समानतेचा संदेश देणारी मोहीम गाजली होती. चूडासामा यांनी त्यांच्या बॅनरवरून सत्ताधाऱ्यांना आणि धर्म पंडितांना चांगलेच धारेवर धरले होते. मारिन ड्राईव्ह येथील सिग्नलवर लावलेल्या त्यांच्या बॅनरमध्ये राजकीय आणि सामाजिक भाष्य केले जात होते. हेच राजकीय भाष्य अनेकदा वर्तमान पत्राच्या ठळक बातम्या ही झाल्या होत्या.
जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे चुडासमा संथापक होते. या संस्थेच्या एकूण ५०० शाखांचा विस्तार त्यांनी केला होता. परदेशातही जायंट्सच्या शाखा आहेत. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज अॅण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कामन मॅन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थाचा कारभारात त्यांचा मोलाचा हातभार होता. सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन २००५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/