नागपूर : भंडारा शहरातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यार्थी आणि शिक्षक अशा एकूण १७४ लोकांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना मळमळ, डोके दुखी, हगवण, उलटया यांचा त्रास होत असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ९७ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर सगळ्यांनी जेवण केले. त्यानंतर हा त्रास त्यांना जाणवू लागला. सुरुवातीला १७४ जणांना त्रास जाणवला होता. मात्र, १७४ पैकी १५५ जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. १९ लोकांवर अजूनही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या स्पर्धेसाठी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील २७०० विद्यार्थ्यांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
उद्घाटनानंतर देण्यात आलेल्या दुपारच्या जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. हळूहळू त्याची संख्या वाढली आणि १७४ जणांना विषबाधेमुळे त्रास जाणवू लागला. त्यापैकी १५५ लोकांवर प्राथमिक उपचार करून परत पाठवण्यात आले. या विषबाधेच्या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ झाली. खुद्द जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या सर्वांना जेवणातून किंवा पाण्यातूनच विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अहवाल आल्यानंतरच समोर येईल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/