उत्तर प्रदेश, बिहारचे नवे समीकरण !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018   
Total Views |

 


 
 
 
२०१४ मध्ये भाजप आघाडीने राज्यातील ४० पैकी ३२ म्हणजे ८० टक्के जागांवर विजय मिळविला होता. २०१९ साठी आमचे मिशन ३५० जागांचे आहे आणि ते आम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू, असा विश्वास भाजपला वाटत आहे. आमच्याकडे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह असे दोन महारथी आहेत. त्यामुळे आम्हाला २०१९ ची कोणतीही चिंता नाही, असाही ठाम विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.
 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश व बिहार या दोन राज्यांत कोणते राजकीय समीकरण राहिल, हे आता जवळपास स्पष्ट होत आहे.बिहारमध्ये जी उलथापालथ होण्याची शक्यता होती, ती आता झाली आहे. राज्यातील एक नेते उपेंद्र कुशवाहा यांनी भाजप आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. ते काँग्रेस आघाडीत जातील हे मानले जात होते. कुशवाहा यांनी गुरुवारी तो निर्णय घेतला. बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, जितनराम मांझी व उपेंद्र कुशवाहा यांच्यात महागठबंधन झाले आहे तर दुसरीकडे भाजप, जनता दल (यु) व रामविलास पासवान यांची युती अशा या दोन आघाड्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढली जाईल. रामविलास पासवान यांचा पक्ष जागावाटपावरून जरा नाराज होता, ती नाराजी आता दूर केली जात असल्याचे समजते. या आठवड्यात बिहारमधील जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

बिहारमध्ये एकूण ४० जागा असून, यात भाजपच्या २२ जागा आहेत. भाजपला या जागा हव्या आहेत. दुसरीकडे जनता दल (यु)ने भाजपच्या बरोबरीने जागा मागितल्या होत्या आणि रामविलास पासवान यांनाही ८ जागा हव्या होत्या. ४० जागांमध्ये या तीन पक्षांना बसविण्याची कसरत भाजपला करावी लागत आहे. यात भाजपच्या काही जागा कमी होतील, हे स्पष्ट होते आहे. त्याची मानसिक तयारी भाजपने केली होती. भाजप-जनता दल (यु) १७-१७ तर रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष ६ असे राज्यांतील जागावाटप होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये दोन्ही आघाड्या तुल्यबळ ठरत असून त्यांच्यात ४० जागांसाठी अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. २०१४ मध्ये भाजप आघाडीने राज्यातील ४० पैकी ३२ म्हणजे ८० टक्के जागांवर विजय मिळविला होता. त्याची पुनरावृत्ती २०१९ मध्ये करण्याचा विश्वास भाजपला वाटत आहे. २०१९ साठी आमचे मिशन ३५० जागांचे आहे आणि ते आम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू, असा विश्वास भाजपला वाटत आहे. आमच्याकडे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह असे दोन महारथी आहेत. त्यामुळे आम्हाला २०१९ ची कोणतीही चिंता नाही, असाही ठाम विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.

 

उत्तर प्रदेश

सर्वात मोठ्या राज्यात-उत्तर प्रदेशात मात्र महागठबंधन होण्यात एक पेच असल्याचे समजते. त्यातही सप-बसप व राष्ट्रीय लोकदल यांच्यात युती झाली असल्याचे म्हटले जाते. काँग्रेससाठी फक्त अमेठी व रायबरेली या दोन जागा सोडण्याची तयारी इतर पक्षांनी दाखविली आहे.

 

विधानसभेचे चित्र

 

मार्च २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, भाजप व मित्रपक्षाला ३ कोटी ५४ लाख मते मिळाली होती तर सपला १ कोटी, ९२ लाख व बसपला १ कोटी, ८९ लाख मते मिळाली होती. काँग्रेसला ४५ लाख तर राष्ट्रीय लोक दलाला १५ लाख मते मिळाली होती. यातील तीन पक्ष सप, बसप व राष्ट्रीय लोक दल एकत्र आले आहेत. काँग्रेसला ८ जागा देण्याची तयारी या पक्षांनी दाखविली असल्याचे म्हटले जाते. काँग्रेसला १२-१५ जागा हव्या आहेत. सप नेते अखिलेश यादव काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. मात्र, बसप नेत्या मायावतींना न दुखावण्यासाठी ते विरोधी पक्षांच्या बैठकींना उपस्थित राहात नसल्याचे म्हटले जाते.

 

उत्तर प्रदेशात अंतिम राजकीय चित्र कसे तयार होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यात तिरंगी लढत झाल्यास ते भाजपच्या हिताचे ठरेल. मात्र, चारही विरोधी पक्षांमध्ये महागठबंधन तयार झाल्यास भाजपला काही अडचणींचा सामना करावा लागेल. राज्यातील ब्राह्मण मतदार आजवर भाजपकडे होता. काँग्रेसने मागील काही महिन्यांपासून राहुल गांधींची ओळख पंडित राहुल गांधी अशी करून देणे सुरू केले आहे. त्याचा परिणाम किती होईल, हे आज सांगणे अवघड जात आहे. यात एक महत्त्वाची बाब म्हणजे ठाकूर म्हणजे राजपूत व ब्राह्मण हे दोन वर्ग एकत्र राहण्याची परंपरा कमी आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद ठाकूर नेत्याकडे असल्याने ब्राह्मणवर्ग त्यावर कशी भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गोरखपूरच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण मतदारांनी सप उमेदवाराला मतदान केल्याने भाजपचा पराभव झाला होता, असे मानले जाते. उत्तर प्रदेशात कसे राजकीय समीकरण तयार होते, याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. कारण येथे तयार होणार्‍या समीकरणावर २०१९ चे राजकीय समीकरण तयार होणार आहे.

 

मिशन – ७५

 

२०१४ मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, ते उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व यशामुळे. राज्यातील ८० पैकी ७३ जागा भाजपला मिळाल्या होत्या. काँग्रेसला दोन, सपला चार व अन्य एक अशा एकूण ७ सात जागा विरोधी पक्षांना मिळाल्या. भाजपने या निवडणुकीसाठी ‘मिशन ७५’ ची घोषणा केली आहे. भाजपनेते राज्यातील ७९ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवित आहेत. राज्यात महागठबंधन झाले तरी, आम्ही ७० जागा जिंकू, असा पूर्ण विश्वास भाजपला वाटत आहे. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात ‘मिशन ७५’ गाठण्यात कोणतीही अडचण नाही, असे भाजपला वाटत आहे. उत्तर प्रदेशात फक्त सोनिया गांधी व सपचे एक दोन असे तीन-चार विरोधी नेते निवडून येतील, असेही भाजपला वाटत आहे. राहुल गांधींना तर त्यांची अनामत रक्कमही वाचविता येणार नाही, असाही विश्वास भाजपनेत्यांना वाटत आहे.

 

दोन मोदी

 

२०१४ मध्ये भाजपला जे यश मिळाले होते, त्यापेक्षा मोठे यश २०१९ मध्ये मिळेल, असे भाजप नेत्यांना का वाटते? एका नेत्याने सांगितले, २०१४ मध्ये आमच्याजवळ फक्त नरेंद्र मोदी होते, आता अमित शाह आहेत. अमित शाह यांच्यासारखा नेता आम्हाला मिळाला आहे, हे आमचे फार मोठे भाग्य आहे. अमित शाह यांच्या सभांना जी अलोट गर्दी होत आहे, ती आश्चर्य वाटावी अशी आहे. म्हणजे २०१४ मध्ये आमच्याजवळ एक मोदी होते, आता दोन मोदी झाले आहेत. मग, ३५० चा आकडा का गाठता येणार नाही? आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ४५० जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो थोडा वाढीव आहे, असे गृहित धरले तरी ३५० तर ४०० जागांची मजल आम्हाला सहज मारता येईल. प्रत्येक राज्यात आमच्या जागा वाढणार आहेत. त्या किती वाढणार एवढाच मुद्दा बाकी आहे. हा नेता सांगत होता, आमच्या विजयाची तीन प्रमुख कारणे राहणार आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची अफाट लोकप्रियता. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात, ‘मन की बात’ हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असल्याचे आढळून आले आहे. ही लोकप्रियता मतांमध्ये परिवर्तित होईल. दुसरा मुद्दा म्हणजे, जन धन योजना. या योजनेचे सारे लाभार्थी भाजपला मतदान करणार हे ठरलेले आहे. तिसरा मुद्दा आहे तो, बेटी बचावो, बेटी पढाओचा. या तीन घटकांमुळे आम्ही ३५० ते ४०० चा आकडा गाठणार आहोत.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्यारोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@