नवी दिल्ली : केंद्रात हिवाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरू होताच गुरुवारी विरोधकांच्या गदारोळामुळे बंद झाले. टीडीपी सदस्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत गोंधळ सुरू झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाजही सुरुवातीला दुपारी १२ आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आहे.
संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने कामकाज स्थगित करावे लागत आहे. राफेल आणि शीख दंगलप्रकरणी न्यायालयाच्या निकालावरून विरोधकांचा संसदेत गोंधळ सुरू आहे. तर आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी राज्याला विशेष दर्जाची मागणी लावून धरली आहे. या गोंधळामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. टीडीपी सदस्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले होते.
राज्यसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना शांततेचे आवाहन करत सभागृहात राफेल, शेती व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु, गदारोळ कायम राहिल्याने कामकाज शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर सदस्यांनी गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. १२ वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ कायमच राहिला त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/