कुर्ह्याच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेतर्फे ज्ञानाच्या 5 शाखांची यशस्वी मुहूर्तमेढ, वाटचाल
कुर्हा, ता.मुक्ताईनगर :
ग्रामीण, दूरवरच्या क्षेत्रातील सामान्य, अतिसामान्य, कष्टकरी कुटुंबातील मुलांना सर्व प्रकारचे सहज, उच्च शिक्षण मिळावे, ते त्यांच्या कुटुंबाच्या आवाक्यात आणि त्यांच्या परिसरात असावे, त्यांना मूलभूत सुविधांसह मिळावे, शैक्षणिक स्पर्धांमध्ये टिकता यावे, ही सारी स्वप्नं साकार केली आहेत, कुर्हा येथील परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेने...
संस्थेचे अध्यक्षपद मूळचे शिक्षक, ध्येयवादी व समर्पित स्वयंसेवक प्रमोद गणपतराव शिवलकर (विहिंपचे मुक्ताईनगर प्रखंड अध्यक्ष) आणि सचिवपदाची जबाबदारी भालचंद्र दिनकर कुळकर्णी यांच्याकडे आहे.पोटासाठी पिढ्या अन् पिढ्या वणवण भटकणार्या आणि शाळेचे तोंडही न पाहू शकणार्या निरक्षर भटक्या विमुक्त समाजबांधवांच्या पुढच्या पिढीला साक्षर करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या आंतरिक चळवळीने संस्था स्थापन झाली.या संस्थेद्वारे संचालित संस्थेतर्फे मोठा ज्ञानयज्ञ गेल्या 2 दशकांपासून सुरू आहे. संस्थेद्वारे संचालित स्व. लक्ष्मीनारायण चौधरी भ.वि.जा.ज. प्राथमिक आश्रमशाळा आणि स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय चालवले जाते. दिवसेंदिवस नवनवीन शैक्षणिक प्रकल्पांची भर पडत आहे.
कुर्हा हे जळगाव जिल्ह्याचे पूर्व सीमेवरील सुमारे 15 हजार लोकसंख्येचे गाव. मुक्ताईनगरपासून तब्बल 35 कि.मी. दूर आहे. मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावर गावाच्या अलीकडे असलेली संस्थेची दुमजली वास्तू आणि लगतच आकाराला आलेली महाविद्यालय व कॉन्व्हेंटची नवी भव्य वास्तू आणि सुंदर वृक्षराजी लक्षवेधक आहे.सद्यःस्थितीतील एकूण 5 शैक्षणिक सेवा प्रकल्प असे-कान्व्हेंट स्कूल (288 विद्यार्थी), भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलांसाठीची निवासी आश्रम प्राथमिक शाळा (120 विद्यार्थी), माध्यमिक शाळा (520), कनिष्ठ व याच वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालय (520 व 100) अशा सुमारे 1600 वर विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण दिले जात आहे.शिक्षक संख्या 65 आहे.
विशेष लक्षणीय बाब म्हणजे प्रामाणिक, पारदर्शी कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे आतापर्यंत सुमारे 22 लाख रु. लोकसहभागातून उभे राहिले आहेत. यामुळेच सकस शिक्षण देणे आणि या सुंदर वास्तू व परिसर निर्माण करणे संस्थेला शक्य झालेले आहे.सुरुवातीला पुरणमल चौधरी यांनी 2 एकर जमीन दान दिली. 2004-5 मध्ये जिल्हाधिकार्यांनी स्वअधिकारात 3 एकरचा विस्तीर्ण भूखंड दिला, त्यावर बांधकाम पूर्ण होत श्री अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल 2013-14 मध्ये सुरू झाली. नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी आणि पहिली ते चौथी अशा 7 वर्गांमध्ये 288 विद्यार्थी आहेत. 5 शिक्षिका, 3 शिक्षक व 2 आया त्यांचा सांभाळ करतात. 2008-09 मध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. विद्यार्थी संख्या 534 असून त्यात कला शाखेच्या अकरावी व बारावीच्या 2-2 तुकड्या आणि विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीच्या 2 तुकड्या अशा एकूण 6 तुकड्या आहेत. गेल्या जूनपासून कला व वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सर्व वर्गांना प्रारंभ झाला. (100 विद्यार्थी) नैसर्गिक वाढीने येथे पदवीपर्यंत शिक्षण मिळू शकणार आहे. प्राचार्यपदाची जबाबदारी व्ही.एस.चौधरी यांच्याकडे आहे.
दर्जेदार शिक्षण, वाजवी फी आणि ती भरण्यासाठीच्या सवलती यामुळे परिसरातील 10 कि. मी. परिघातील 17-18 गावांची मुलं येथे शिकतात. कुर्हा, काकोडा, निमखेडी, गोरखेडा, राजोरा, हिवरा, खेरोळा, पिंप्राळा, भोटा, नालखेडा, पारंबी, धामणगाव, लहान बोदवड, चारठाणा, इच्छापूर, फासेपारधी बांधवांची वस्ती (बेडी) असलेल्या मधापुरी (बेडी) येथील ही मुलं शाळेच्या विशेष वाहन आणि वाहनांद्वारे ये-जा करतात. अनेक पालकही त्यांची आण-ने करतात.
भारतीय संस्कृतीतील गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन इ.सण, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समरसता, सेवाभाव, राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करणारे उत्सव, उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागाने साजरे होतात. त्यानिमित्त वादविवाद, वक्तृत्व इ. स्पर्धाही होतात. परिसरातील दर्जेदार शिक्षणविषयक परवड पाहता विद्यार्थी संख्या मोठी आहे. संस्थेकडे प्रवेशासाठी रांगा लागत असतात. पण गेल्या 5-10 वर्षापासून शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त जागा आहेत. नाममात्र मानधन तत्त्वावर काही शिक्षक नेमत मार्ग काढण्यात आलेला आहे. तरीही प्रवेश नाकारणे भाग पडत आहे. विनाअनुदानित वर्गांना अनुदान मिळणेही आवश्यक आहे.
(संपर्क- प्रमोद शिवलकर -7620632516)
बँक, स्पर्धा परीक्षांसाठीचे वर्ग, कौशल्याधारित प्रशिक्षण
भटक्या विमुक्त जाती-जमातीतील पूर्ण निरक्षरांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे, या उदात्त हेतूने त्यांना साक्षर करण्याचे आव्हान पेलावे, या विचारप्रवाहाचा परिणाम 1995 मध्ये ‘परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था’ नावाने स्थापन झाला. अन्य समाजघटकांमध्येही ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याची अत्यंत गरज असल्याचे सर्वच समाजबांधवांना जाणवले आणि प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या तसेच बाजूच्या महाविद्यालय व इंग्रजी माध्यम शाळेच्या स्थापनेला गती मिळत गेली. कमी, अनियमित पर्जन्यमान, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणार्या समाजबांधवांचा या वास्तूंच्या उभारणीसाठी आतापर्यंत 20 लाख रु.चा लोकसहभाग राहिला आहे. नवतरुणांमधील बेरोजगारी आणि नैराश्य दूर करण्यासाठी बँक भरती व स्पर्धा परीक्षांसाठीचे वर्ग व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
विभागस्तरावर चमक...
जानेवारीत 5 दिवस जम्बो वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कलागुणांंना पूरक स्पर्धांची धमाल, करमणुकीचे कार्यक्रम असतात. शैक्षणिक यशासह बेला कोळी (रा.चारठाणा) ही धावण्याच्या स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम आली. भालाफेकीतही विद्यार्थी प्रथम आला. ‘चला खेळू या’ या पंतप्रधानांच्या उपक्रमात कबड्डीत आश्रमशाळेचा मुलांचा संघ पहिला आला होता.