रणभूमी अयोध्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |



अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्ती हा अलीकडच्या काळातला राजकीय किंवा धार्मिक प्रश्न समजला जातो, पण तसा तो नाही! त्याला किमान ४९० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी/पूर्वपीठिका आहे. अयोध्येच्या (पराभूत) भारतीयांनी श्रीरामजन्मभूमी आक्रमकांच्या ताब्यातून मुक्त करून परत मिळवण्यासाठी असंख्य युद्धे लढली. इ.स. १५२८ पासून इ.स. १९३४ पर्यंतच्या काळात इतिहासाला ज्ञात असलेली ७६ युद्धे ‘श्रीरामजन्मभूमी मुक्ती’साठी लढली गेली. तद्नंतर १९९२ साली स्वातंत्र्योत्तर काळात लढलेले ७७ वे युद्ध होते.


अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या विषयावर सामान्यतः ज्या चर्चा होतात किंवा जी मते व्यक्त केली जातात, त्यामध्ये बहुधा शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधींनी विवादित परिसराची कुलूपे उघडण्याचा घेतलेला निर्णय; (जो संभवतः शहाबानो प्रकरणात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर होत असलेल्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून (?) घेतला असावा असे मानले जाते) व त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा व श्रीरामजन्मभूमी प्रश्नावरून सुरू केलेले आंदोलन (वि. हिं. परिषद, बजरंग दल आदी संघ परिवारातील इतर संघटनांच्या माध्यमातून) इथपासूनच चर्चेला सुरुवात होते. एकूण आभास असा निर्माण होतो की, हे श्रीरामजन्मभूमी ‘प्रकरण’ अगदी अलीकडच्या काळातले असून, त्यात मुख्यत्वे भाजप, विश्व हिंदू परिषद व संघ परिवारातील इतर हिंदुत्ववादी संघटना यांचाच सक्रिय सहभाग आहे. किंबहुना, या वादाची ‘निर्मिती’ ही त्यांचीच आहे. या लेखाचा हेतू मूळ प्रश्नाचा थोडा ऐतिहासिक मागोवा घेऊन हा आभास दूर करणे आणि मूळ प्रश्न वास्तव स्वरूपात मांडणे हा आहे.

 

या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे असे :

 

. हा प्रश्न मुळात जसा ‘अलीकडच्या काळातला राजकीय किंवा धार्मिक प्रश्न’ समजला जातो, तसा तो नाहीच आहे. त्याला किमान ४९० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी/पूर्वपीठिका आहे. इ.स. १५२८ मध्ये मुघल आक्रमक बाबर याचा सेनानी मीर बाकी याने अयोध्येतील श्रीराम मंदिर पाडले व त्या जागी मशीद बांधण्याचा प्रयत्न केला, इथपासून या प्रश्नाची सुरुवात होते. श्रीराम हे भारतीयांच्या ‘स्व’त्त्वाचे, अस्मितेचे प्रतीक होते आणि अयोध्येतून, त्याच्या जन्मभूमीतूनच त्याचे अस्तित्व मिटवणे, उद्ध्वस्त करणे, यामध्ये पराभूत भारतीयांना अवमानित करणे, त्यांचा देवही त्यांचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत कठोरपणे दाखवून देणे, ठसवणे, हाच हेतू होता. प्रत्येक युद्ध हे खरेतर मानसिक युद्धच असते. जोवर पराभूत व्यक्ती-समाज आपला पराभव मानसिकदृष्ट्या स्वीकारत नाही, तोवर केवळ युद्धातील पराभव हा ‘खरा पराभव’ नसतो. अयोध्येच्या बाबतीत नेमके हेच झाले. जरी अयोध्येतील मंदिर मीर बाकी (बाबराचा सेनानी)ने तोफा डागून उद्ध्वस्त केले, तरीही स्थानिक लोकांच्या प्रखर विरोधामुळे तिथे भव्य मशीद बांधण्याचे त्याचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही. जेता असूनही बाबर तिथे मशीद बांधू शकला नाही, यावरूनच स्थानिकांचा विरोध किती जबरदस्त असावा, याची कल्पना येते. बाबराचा सेनानी मीर बाकी याने तिथे मुळात असलेले श्रीराम मंदिर पाडले, याचा पुरावा खुद्द बाबराने काढलेल्या शाही फर्मानातच मिळतो. या शाही फर्मानाचा अनुवादित सारांश असा : ‘शहेनशाह-ए-हिंद मलिक उल जहान बादशहा बाबर यांच्या हुकूमावरून अयोध्येतील रामजन्म स्थान पाडून उद्ध्वस्त करण्याची ‘परवानगी’ दिली गेली आहे. हे स्थान नष्ट करून, त्यातून मिळालेल्या सामग्रीतून त्या जागी मशीद उभारण्याचे शाही आदेश आहेत. हिंदुस्थानातील अन्य भागांतून कोणीही हिंदू अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही, हे काटेकोरपणे पाहावे लागेल. जर असा कोणी हिंदू अयोध्येत आलेला दिसला आणि त्याच्या हेतूविषयी संशय आला, तर त्याला पकडून ठार करणे हे तुमचे कर्तव्य राहील.’ यावरून हे उघड आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधणे, हे सोपे नव्हते. त्यामुळेच मुघल बादशहा बाबर याने बाहेरून आलेल्या कोणाही हिंदूला केवळ संशयावरून ठार मारण्याचे सक्त आदेश आपल्या सैनिकांना देऊन ठेवले.

 

. इथून सुरू होते एका प्रदीर्घ लढ्याची कहाणी. अयोध्येच्या (पराभूत) भारतीयांनी श्रीरामजन्मभूमी आक्रमकांच्या ताब्यातून मुक्त करून परत मिळवण्यासाठी लढलेल्या असंख्य युद्धांची कहाणी. इ.स. १५२८ पासून इ.स. १९३४ पर्यंतच्या काळात इतिहासाला ज्ञात असलेली ७६ युद्धे ‘श्रीरामजन्मभूमी मुक्ती’साठी लढली गेली. त्यांचा थोडक्यात तपशील असा, बाबराच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत (१५२८ ते १५३०) अयोध्येच्या लोकांनी रामजन्मभूमी ताब्यात घेण्यासाठी चार युद्धे लढली. पुढे मुघल बादशहा हुमायूनच्या सत्ताकाळात (१५३० ते १५५६) दहा, अकबरच्या कारकिर्दीत (१५५६ ते १५६६) २०, औरंगजेबाच्या सत्ताकाळात (१६५८ ते १७०७) ३०, त्यानंतर मुघल साम्राज्याच्या पतनानंतर अयोध्येत नवाबांचा अंमल सुरू झाला. त्यामध्ये नवाब सादतअलीच्या कारकिर्दीत (१७७० ते १८१४) पाच, नसिरुद्दीन हैदर याच्या काळात (१८१४ ते १८३६) तीन, नवाब वाजीद अली शाह याच्या काळात (१८४७ ते १८५७) दोन युद्धे लढली गेली. त्यानंतर ब्रिटिश आमदनीतही (१९१२ ते १९३४) दोन युद्धे श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी लढली गेली. यामध्ये विशेष म्हणजे वेळोवेळी लढल्या गेलेल्या या युद्धांमध्ये असंख्य वेळा पराभूत होऊनही, भारतीयांनी श्रीरामजन्मभूमीचा ताबा परत मिळवण्याची आपली दुर्दम्य इच्छा, आकांक्षा जराही क्षीण होऊ दिली नाही. असंख्य योद्ध्यांना वीरमरण येऊनही पुन्हा पुन्हा भारतीय योद्धे श्रीरामजन्मभूमीसाठी प्राणपणाने लढत राहिले. पिढ्यान्पिढ्या चाललेला हा संघर्ष हेच दाखवून देतो की, हा काही एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी, एखाद्या वास्तूसाठी, झालेला संघर्ष नसून, यामध्ये त्यापेक्षा बरेच काही अधिक महत्त्वाचे, अधिक उच्च पातळीवरचे समाविष्ट आहे; ते आहे भारतीयांचे ‘स्व’त्त्व, अस्मिता, स्वाभिमान. भारतीयांचे भारतीयत्त्व त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू श्रीराम, श्रीकृष्ण व भगवान शंकर असल्याचे डॉ.राममनोहर लोहिया यांनी म्हटले होते, (लोहिया कोणी हिंदुत्ववादी नव्हते) त्याची इथे आठवण होते. अगणित पराभव पचवूनही पुन्हा पुन्हा उभे राहण्याची, लढण्याची प्रेरणा देणारे हे जे काही आहे, त्याची दखल कोणाही विचारी माणसाला घ्यावीच लागेल. जी प्रेरणा शतकानुशतके इतकी जीवंत राहते, ती निश्चितच तात्कालिक, कमी महत्त्वाची, दुर्लक्षणीय नाही. (मात्र, १९९२ पासून ज्या तऱ्हेने हा प्रश्न राजकारण्यांकडून व तथाकथित धार्मिक नेत्यांकडून-स्वत:च्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी वापरला, हाताळला जात आहे, ते अत्यंत दुर्दैवाचे म्हणावे लागेल. त्यामुळे या प्रदीर्घ संघर्षाला केवळ कमीपणा मात्र आणला जातो आहे.)

 

. इथे आपण जगात इतरत्र घडलेल्या अशाच ऐतिहासिक घटनांचा (उदाहरणादाखल) विचार करू शकतो. पोलंडवरील रशियन सत्ता (१६१४ ते १९१५) संपुष्टात आल्यानंतर इ.स.१९१८ मध्ये पोलिश जनतेने सर्वप्रथम जर कुठली गोष्ट केली असेल, तर ती म्हणजे वॉर्सा येथे शहराच्या मध्यभागी रशियनांनी उभारलेले ‘Russian Orthodox Christian Cathedral’ जमीनदोस्त करणे, ही होय. यात विशेष म्हणजे, हे करणारे पोलिश लोक स्वत: ख्रिश्चन होते व पाडलेल्या चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचीच पूजा-उपासना होत होती. असे असूनही त्यांनी रशियनांनी बांधलेली ती वास्तू पाडली. कारण, ते तिच्याकडे परकीय सत्तेचे, (त्यांच्या गुलामीची आठवण करून देणारे) प्रतीक म्हणून बघत होते, केवळ चर्च म्हणून नव्हे. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने केलेल्या अमानुष दुष्कृत्यांबद्दल पुढे जर्मन जनतेने प्रांजळपणे क्षमायाचना केली. त्याद्वारे त्यांनी हेच दाखवून दिले की, नाझीवादाला त्यांचा पाठिंबा नव्हता, नाही. त्यांनी हिटलरला आपला म्हणून त्याचे समर्थन करण्याचा अट्टाहास केला नाही. अगदी याच तऱ्हेने बघितल्यास (सध्याच्या) भारतीय मुस्लिमांनी मध्ययुगीन आक्रमक बाबर याला स्वीकारण्याची, आपला मानण्याची काहीच गरज नाही. तत्कालीन संघर्ष हा केवळ हिंदू- मुस्लीमसंघर्ष नसून भारतीय आणि परकीय आक्रमक यांच्यातील संघर्ष होता, हे भारतीय मुस्लिमांनी समजून घेण्याची गरज आहे.

 

. इ.स.१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात जेव्हा हिंदू-मुसलमान एकत्रितपणे ब्रिटिशांविरुद्ध लढले, त्यावेळी अयोध्येतील स्थानिक मुस्लीम नेता अमीर अली याने जाहीरपणे असे म्हटले होते की, मुस्लिमांनी अयोध्येतील विवादित ढाचा आपल्या हिंदू बांधवांना सुपूर्द करावा. दुर्दैवाने १८५७ च्या संग्रामात भारतीयांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी अमीर अली व त्याचा साथीदार रामचरण दास या दोघांना १८ मार्च १८५८ या दिवशी एका चिंचेच्या झाडावर फाशी दिली. ते चिंचेचे झाड पुढे कित्येक वर्षे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक बनले व हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजांकडून ‘पूजले’ जाऊ लागले. हिंदू-मुस्लीम समाजांतील हे वाढते बंधुत्त्व ब्रिटिश शासकांच्या चिंतेचा विषय बनले व त्यांनी शेवटी ते चिंचेचे झाड समूळ उपटून टाकले! दुर्दैवाने इतिहासाच्या या भागाकडे अजूनही म्हणावे तसे लक्ष दिले गेलेले नाही.

 

. ६ डिसेंबर, १९९२ मध्ये जी वास्तू पाडली गेली, ती मशीद नसून केवळ विवादित ढाचा होता, हे दर्शवणारे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वचा म्हणजे ‘साहिफा-ए-चहल नसा-इ-बहादुरशाही’ हा बहादुरशहा (सतराव्या शतकाची अखेर/अठराव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेला) च्या कारकिर्दीचे वर्णन करणारा ग्रंथ. त्या ग्रंथात असे स्पष्ट म्हटलेले आहे की, बादशहाच्या हुकूमाने (फर्माने बादशाही) ज्या मशिदी बांधण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये नमाज-खुत्बा पढण्याची परवानगी नाही. हिंदूंची (काफिरांची) त्यांच्या मथुरा, काशी, अयोध्या येथील मंदिरांवर फार श्रद्धा असते. (इथे मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, सीता रसोई व हनुमानस्थान यांचा उल्लेख आहे). ही सर्व स्थाने उद्ध्वस्त करण्यात येऊन त्या ठिकाणी मशिदी बांधण्याचा उद्देश केवळ इस्लामी सत्तेचे सामर्थ्य दाखवण्याचा होता. या मशिदींना जुमा/जमियत अदा करण्याची परवानगी नव्हती. मात्र, त्यांमध्ये कुठल्याही मूर्तीची पूजा होणार नाही तसेच शंखनाद केला जाणार नाही, असे सक्त आदेश होते. इस्लामच्या संकेतांनुसार, जिथे नियमित नमाज अदा केला जात नाही, ती मशीद असूच शकत नाही. यावरून हे लक्षात येते की, अयोध्या, मथुरा, काशी या पवित्र तीर्थक्षेत्रांत उभारण्यात आलेल्या मशिदी या वास्तविक मशिदी नसून वेगळ्या उद्देशाने (पराभूतांना अपमानित करण्याच्या आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने) उभारलेल्या वास्तू आहेत.

 

. आणखी एक दुर्लक्षित मुद्दा म्हणजे अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मुक्ती संघर्षात शीख समाजाचे लक्षणीय योगदान. शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’मध्ये बाबराच्या पाशवी आक्रमणाचे, त्याने सतत केलेल्या मंदिर विद्ध्वंसाचे स्पष्ट वर्णन आहे. प्रभू श्रीरामाचा उल्लेख त्या ग्रंथात सुमारे २ हजार ५०० वेळा आलेला आहे. औरंगजेबाच्या काळात अयोध्येतील बाबा वैष्णव दास (समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य) यांनी शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांची मदत मागितली. त्यावेळी फक्त १८ वर्षांचे असलेले गुरू गोविंद सिंह यांनी आनंदाने ती मागणी मान्य केली. इतकेच नव्हे, तर ते स्वत: सैन्य घेऊन, प्रयागमार्गे अयोध्येला आले. हिंदू-शीख यांनी एकत्रितपणे औरंगजेबाच्या सैन्याचा (प्रथम जाबाझ खान व पुढे सय्यद हसन अली यांच्या नेतृत्वाखालील सैन्याचा)पराभव केला. ‘आलमगीर नामा’ या ग्रंथात हे नमूद आहे. गुरू गोविंद सिंह यांच्या आत्मवृत्तपर ग्रंथात हे नमूद आहे की. ते स्वत:ला श्रीरामाचा पुत्र लव याचे वंशज, तर गुरू नानक देव यांना श्रीरामपुत्र कुश याचे वंशज मानत. त्यांनी खालसा पंथाची स्थापना परकीय इस्लामी आक्रमकांशी (ज्यांना त्यांनी तुर्क म्हटले) लढून त्यांचा पराभव करण्यासाठीच केली.

 

अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मुक्ती संघर्षाचा इतिहास हा थोडक्यात असा आहे. तो संघर्ष कुठल्याही अलीकडच्या राजकीय पक्ष वा संघटनेचे कर्तृत्व नाही. परकीय आक्रमक व इथला भारतीय समाज यांच्यातल्या शतकानुशतके चाललेल्या अस्मितेच्या संघर्षाचे वर्तमानात येऊन पोहोचलेले टोक आहे ते. एकदा हे समजून घेतले की, श्रीरामजन्मभूमी आंदोलन हे केवळ हिंदूंचे नसून संपूर्ण भारतीय समाजाचे आहे, हे लक्षात येईल. सध्याच्या भारतीय समाजाच्या कुठल्याही घटकाने (मग तो कोणत्याही धर्माचा का असेना) स्वत:ला मध्ययुगीन आक्रमकांशी जोडण्याची, त्यांना मनाने स्वीकारण्याची काहीच गरज नाही. या आंदोलनाला क्षुद्र पक्षीय राजकारण किंवा हिंदू-मुस्लीम संघर्षाचा रंग येणे, हे तर अत्यंत दुर्दैवी ठरेल.

 

- श्रीकांत पटवर्धन

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@