पनवेल : पनवेलजवळील रसायनी परिसरात एका कंपनीतून वायूगळती झाल्याने १०० पक्षी, २८ वानर आणि ४८ माकडांचा मृत्यू झाला आहे. संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी आता केली जात असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रसायनी परिसर, कर्नाळा किल्ला आणि पाताळगंगा परिसरातील गावांना घेरा माणिकगड किल्ल्याच्या डोंगररांगा लागून आहेत. जंगलात भेकर, रानडुक्कर, माकड, ससा, मुंगूस, घोरपड, मोर आदी प्राणी आढळतात.
जंगल परिसरातील माकड व वानर अन्नाच्या शोधासाठी जंगलातून खाली उतरून वस्तीत येतात. पाताळगंगा परिसरातील एचओसी कंपनीतून बुधवारी रात्री ९.४५ वाजता मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली होती. या वायुगळतीत १०० पक्षी, २८ वानर आणि ४८ माकडांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एचओसीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चुकीवर पांघरुण घालण्यासाठी एका रात्रीत या प्राण्यांना जेसीबीच्या मदतीने खड्डे खणून गाडताना पाहिले, असे गावकऱ्यांनी सांगितले. या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे वानर आणि माकडांचा जीव गेला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेमुळे प्राणी मित्रांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/