मुंबई शहराला पाणीपुरवठा हा तलावातून होतो. तलावात १० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्क्यांची कपात केली. अनेक मुंबईकरांना यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नगरसेवक स्थायी समिती आणि पालिका सभागृहात मुंबईच्या पाणीप्रश्नाचा सतत पाठपुरावा करत आहेत. परंतु पालिका प्रशासन याबाबत उदासीन आहे. यामुळेच बुधवारी स्थायी समितीत याचे पडसाद उमटले. अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले या परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याचे भाजपचे अंधेरी येथील नगरसेवक अभिजीत सामंत यांनी निदर्शनास आणून दिले. मुंबईतील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटेपर्यंत स्थायी समितीतच ठिय्या मांडण्याचा त्यांनी इशारा दिला. अभिजीत सामंत यांच्या या भूमिकेला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे प्रशासनाची कोंडी होताना दिसली.
“मुंबईतील पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. आता पाण्याचे टँकर मिळत नाहीत. पाणी सोडण्याच्या वेळा बदलूनदेखील काही उपयोग झालेला नाही. काहीवेळा तर पाणी अवघ्या १५ मिनिटांसाठी सोडण्यात येते. मुंबईतील अनेक ठिकाणी पाण्याच्या वेळा बदलल्यामुळे रात्रभर जागून महिलांना पाणी भरावे लागते. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसल्यास दुसऱ्या विभागातील पाणी बंद करून पाण्याचा प्रश्न तात्पुरता सोडविला जातो. अशाप्रकारची बनवाबनवी पालिका प्रशासन करत आहे.” असे अभिजीत सामंत यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिके मुख्य जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी मुंबईतील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी पाणी पुरवठ्याचा ‘मायक्रो प्लॅन’ तयार केला असल्याची माहिती दिली. “या ‘मायक्रो प्लॅन’ मध्ये तत्कालीन आणि दीर्घकालीन अशा दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येणार आहे. जलवाहिन्या दुरुस्तीसारखी छोटी कामे ही तत्कालीन कामांमध्ये करण्यात येतील. तर पाणीगळती रोखण्याचे काम हे दीर्घकालीन कामांमध्ये केले जाणार आहे. नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन त्यांच्या तक्रारींनुसार पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून उपाय योजना करण्यात येतील.” असे अशोककुमार तवाडिया यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/