त्यांना भान येवो..
महाराष्ट्र शूरांची भूमी, विरांची भूमी आणि हो, ज्ञानी विचारवंतांचीही भूमी. महाराष्ट्राची जनता तशी सारासार विचार करणारी. पण, स्वतःला मराठी लोकांचा पक्ष, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षाचा महाराष्ट्राची जनता विचार करू शकते, यावरचा विश्वास उडालेला दिसतो आहे. हो ना, तसे नसते तर या पक्षाने भाजपशी सत्तेत हातमिळवणी करून सत्तेचे फायदे लुटून वर केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार कसे चांगले नाही, हे सांगण्यात उरलेली हयात घालवली नसती. अर्थात शिवसेनेला यात वावगे वाटत नाही. पण महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतेच! महाराष्ट्र पुढारलेला आहे. लोक वर्तमानपत्र वाचतात, राजकीय घडामोडींचा परामर्श घेतात. त्यामुळे जनता म्हणते की, शिवसेना पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना जर भाजपइतकाच नकोसा आहे, तर मग खिशातले राजीनामे बाहेर का येत नाहीत? असो, कदाचित आपण राजीनामे खिशात ठेवले होते, हे नेते विसरले असतील. मुळात हिंदुत्ववादी विचारसरणीने एका व्यासपीठावर आलेले भाजप-शिवसेना पक्ष. तसे भाजप आणि शिवसेनेने जनतेसमोर अनेकदा दर्शवलेही आहे. मात्र, सत्तेच्या वाट्यात आपले पारडे जड राहावे म्हणून शिवसनेने सध्या विलाप चालवला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा झालेला विजय. भाजपने त्यांचा गड असलेल्या तीन राज्यांतली सत्ता गमावली. भाजपचे मित्रपक्ष आणि केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाला यावर काय वाटायला हवे? अर्थात हे राजकारण आहे. इथे कोणी कुणाचे मित्र नाही नि शत्रूही नाहीत, हे मान्य. तरीही भाजपच्या पराभवात खारीचा वाटा आमचाच हे भूषवण्याची अहमिका सत्तेतल्या भागीदार मित्रपक्षाने केली तर काय म्हणावे? इथे संविधानाचे राज्य आहे आणि न्यायालय ठरवेल तेच होईल. तरीही अयोध्येला जाऊन आरती करून त्याचे ‘मार्केटिंग’ करण्याचे कामही केले गेले. सगळ्यांनाच माहिती आहे की, असे करून काही होत नसते. आपण जे हे करतोय ते करून फक्त फुकटची शो शायनिंग करतो. हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, हेसुद्धा समजण्याची सारासार बुद्धी जर यांच्यात राहिली नसेल, तर मग बोलण्यात काही अर्थच नाही. मात्र, तरीही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो, याचे भान त्यांना येवो हीच इच्छा!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/