अब खाली हाथ ना आना...
४३ वर्षांचे शल्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला यावर्षी हॉकी विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आणि या शल्यासोबत मैदानात उतरलेले भारतीय युवा खेळाडू अगदी मंतरल्यासारखे खेळले. आपल्या गटातील सगळे सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. पण, यापुढचा प्रवास हा भारतासाठी आणखी खडतर होणार आहे, कारण उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ बलाढ्य नेदरलँडशी होणार असून या सामन्यात चुकीला कोणताही वाव नाही. कारण, तीनवेळा विश्वविजेत्या नेदरलँडने आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाची चव चाखलेली नाही. त्यामुळे भारताला आक्रमक होणे बंधनकारक असणार आहे. भारताने आपल्या गटातील प्रत्येक संघाला धूळ चाखत खेचून आणलेल्या यशश्रीची सध्या प्रसारमाध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे, ‘अब खाली मत आना.’ कारण, भारताने १९७५ नंतर उपांत्य फेरी कधीही गाठली नाही आणि १९७५ सालीच भारताने एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे ही उपांत्यपूर्व फेरी भारतासाठी अंतिम सामन्यासारखीच असणार आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला भारताने ५-० ने पराभूत केल्यानंतर आता फक्त नेदरलँडवर भारताला लक्ष केंद्रित करायचे आहे. आतापर्यंत भारताचा जिंकण्याचा क्रम पाहिला तर भारताने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणण्यासाठी आक्रमक खेळण्याचे तंत्र वापरले आहे. मात्र, कॅनडा, बेल्जियमविरोधात भारताने बचावात्मक पवित्रा घेतला आणि तो सामना बरोबरीत सुटला, तर दुसरीकडे नेदरलँडचा संघ हा सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबतो, याचा प्रत्यय कॅनडा विरुद्धच्या सामन्यात आला. हा सामना एकतर्फी झाला असला, तरी भारताला या सामन्यातून धडा घेण्यासारखे बरेच प्रसंग होते. कॅनडाने सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून स्वीकारलेले बचावात्मक धोरणच धोकदायक ठरले आणि बेल्जियमने हा सामना ५-० असा एकतर्फी जिंकला. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला संघाच्या आक्रमक खेळीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण, या मिळालेल्या संधीचा फायदा उठवणे उपांत्यपूर्व फेरीत महत्त्वाचे ठरेल. ही खडतर लढत असली तरी, जो संघ मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करेल, तोच विजयी ठरेल हे मात्र नक्की. त्यामुळे ४३ वर्षांनंतर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, हे गुरुवारी कळेल...
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/