कायमस्वरुपी उपाययोजनांची पालकांची मागणी
जळगाव :
‘वाहतूक कोंडीमुळे मुलांचे जीवित धोक्यात’ या मथळ्याखाली 30 रोजी ‘तरुण भारत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत शहरातील ला.ना. शाळा आणि आर.आर.महाविद्यालय रस्त्यावर ‘ नो-एन्ट्री’ आणि या रस्त्याने धावणार्या चारचाकी आणि दुचाकीचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करुन वाहतूकधारकांना नियमांची अंमलबजावणी करावी याविषयी समज दिली.
ला.ना. शाळा आणि आर.आर.महाविद्यालय रस्त्यावर काही कालीपिलीचालक, सायकलस्वार विद्यार्थी, दुचाकीधारक नागरिक, रिक्षाधारक आणि चारचाकी चालकांमुळे सायंकाळी आणि सकाळी वाहतूक ठप्प होत असते.
दरम्यान, याठिकाणी रोज काही ना काही दुर्घटना घडत असतात. यावर कायस्वरुपी उपाययोजना व्हावी, अशी मागणी काही पालकांनी ‘तरुण भारत’कडे केली होती.
धूमस्टाईल वाहनधारकांना आवरणार कोण ?
रस्त्यांची दैना झालेली असतानाही अनेक तरुण धूमस्टाईलने तुफान वेगात वाहने चालवितात. वाहतूक पोलिसांच्याही डोळ्यासमोर काही नागरिक सिग्नल तोडून पळ काढतात...जीवघेण्या अपघातांना आमंत्रण देणार्या अशा बेपर्वा वाहन चालवणार्यांना हिसका दाखण्यात यावा, अशी मागणी आहे.
यापुढे होणार कारवाई
ला.ना. शाळा आणि आर.आर.महाविद्यालय रस्त्यावर सायंकाळी 5.30 दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुनसक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पी.एन.वानखेडे, मराठे यांनी 20 वाहनधारकांवर कारवाई केली.
वाहतूक नियमांचे पालन न करणार्या वाहनधारकांवर यापुढे अशी कठोर कारवाई केली जाईल, असे पो.उपनि. पठाण यांनी ‘तरुण भारत’ ला सांगितले.