काँग्रेसचे घंटावादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018   
Total Views |



काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा. नाव जनसंघर्ष. पण या यात्रेत लोकांपेक्षा जास्त उपस्थिती होती, ती काँग्रेसच्या आजी-माजी नेतेमंडळींची. या नेत्यांच्या पाठीपुढे फिरत असणाऱ्या त्याच त्याच लोकांची.


 

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा. नाव जनसंघर्ष. पण या यात्रेत लोकांपेक्षा जास्त उपस्थिती होती, ती काँग्रेसच्या आजी-माजी नेतेमंडळींची. या नेत्यांच्या पाठीपुढे फिरत असणाऱ्या त्याच त्याच लोकांची. ही सगळी मंडळी मोठ्या व्यासपिठावर बसून प्रचंड भाषणबाजी करत होते. अशी प्रचंड भाषणबाजी म्हणजे काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा होती. तर औरंगाबादला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा होती. भाजप, मोदी, फडणवीस यांच्यावरची मुक्ताफळं उधळत नेहमीची मंडळी आपल्या भूमिका कशाबशा रंगवत होत्या. या यात्रेमध्ये शेतकरी, महागाई, आरक्षण वगैरे नेहमीची गाणी निरर्थक बेसूर स्वरात केकाटली गेली. हो, मात्र या जनसंघर्ष यात्रेमधील सगळ्यात विनोदी तुकडा सांगितल्याशिवाय राहवत नाही. यात्रेत ‘युती सरकारची चार वर्षे’ असे लिहून त्याखाली एक घंटा ठेवलेली होती. जनसंघर्ष यात्रेच्या कार्यक्रमात मोठ्या सन्मानाचे आणि महत्त्वपूर्ण काम म्हणून महाराष्ट्राचे कॉँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घंटा वाजवली. मल्लिकार्जुन यांनी ही घंटा का बरं वाजवली? त्यांच्या मते, युती सरकारच्या चार वर्षांच्या काळात घंटा कामे झाली आहेत म्हणून ही घंटा वाजवली. वा! वा! वा! काँगेसच्या मते एक अत्यंत सर्जनशील कार्यक्रम करण्यात आला. आता काँग्रेस आणि सर्जनशीलता, सृजनशीलता वगैरेंचा काही ताळमेळ असतो का?, असा प्रश्न कृपया विचारू नये किंवा मनातही आणू नये. कारण मी आधीच म्हटले आहे की, काँग्रेसच्यामते सर्जनशील कार्यक्रम झाला. लोकांच्यामते तो बालिश म्हणण्यापेक्षा विदुषकी कार्यक्रमही असू शकतो. तरीही काँग्रेसच्या नजरेतून पाहू. त्यांच्यासाठी घंटा बडवणे, हा नाविन्यपूर्ण कार्यक्रमच असणार. कारण त्यांना आतापर्यंत थुंकी झेलणे, हाजी हाजी करणे, चपला उचलणे, उठसूठ दिल्लीच्या वाऱ्या करणे, जमेल तिथे आपले कमिशन उपटत आपल्या सात पिढ्यांचे कोटकल्याण करणे याच कृती माहिती होत्या. त्यामुळे घंटा वाजविण्याचा कार्यक्रम करणे हा त्यांच्यासाठी मोठा सर्जनशील कार्यक्रम असेल यात शंकाच नाही. मात्र, काँग्रेसच्या या घंटा वाजविण्यासंबंधी लोकांचे म्हणणे आहे की, २०१९ मध्येही काँग्रेसला जनतेकडून प्रचंड नकारघंटाच मिळणार आहे. ती ऐकून त्यावेळी शॉक बसण्याऐवजी ती नकारघंटा आतापासून ऐकण्याचा सराव काँग्रेसने या जनसंघर्ष यात्रेत केला. असे असेल तर काँग्रेसने मनमुराद घंटा वाजवाव्यात, कुणाचाही आक्षेप नाही.

 

गुन्हे करा, पर्वा नाही..

 

कोई कहता है, इसके ऊपर तो चार केस हैं। मैं तो कहता हूँ होए बड़े पांच। मैं तो बडे स्पष्ट रूप से कहता हूँ कि, मुझे तो जीतनेवाला चाहिए।” काँग्रेसचे अंतरंग उलगडून दाखवणारे हे वक्तव्य केले आहे काँग्रेसचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष कमलनाथ यांनी. या वाक्याच्या पाठीपुढे किती संदर्भ लागतील? जसे कितीही गुन्हे करा, लुटपाट करा, दरोडेखोरी करा, बलात्कार करा, खून करा, वर तोंडी लावायला म्हणून भ्रष्टाचार सुरूच ठेवा. गुन्ह्याची अजिबात पर्वा करू नका. फक्त गुन्हेगारांमध्ये जिंकून यायची क्षमता हवी. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक म्हणजे एक उत्सव असतो. या उत्सवामध्ये लोकांनी लोकांसाठी प्रतिनिधी निवडणे अभिप्रेत असते. निवडून येणारा उमेदवार मानवी मूल्ये जपणारा, राज्यघटनाप्रणित कायदा-सुव्यवस्था मानणारा आणि सर्वात मुख्य म्हणजे लोकांना आपलासा वाटणारा हवा, ही साधी आणि स्वच्छ लोकांची भावना असते. मात्र, अपवाद वगळून बहुसंख्य राजकीय पक्ष अशा उमेदवारांना तिकीट देतात की, त्यांना पाहून जनतेला वाटते, ‘दिल के अरमाँ आसूओं मे बह गये.’ कधी कधी वाटते की, गुन्हेगाराला लोक आपला प्रतिनिधी का मानतील? लोकांना का वाटेल की, ही गुन्हेगार मंडळी आपले कल्याण करतील? पण तरीही पट्टीच्या गुन्हेगारांना निवडणुकीचे तिकीट दिले जाते. याचे उघड उघड समर्थन काँग्रेसच्या कमलनाथ यांनी केले आहे. गुन्हेगारांचे समाजीकरण व्हावे, यात दुमत नाही. पण त्यांना एकदम जनतेचे राजकीय प्रतिनिधित्व देणे, सत्तेची चावी देणे हे म्हणजे अतिच झाले. दुर्दैवाने राजकारणात या विचारांचीच चलती आहे. जितका मोठा गुन्हेगार, त्याची तितकी मोठी पोहोच, असे समीकरणच काँग्रेसमध्ये झाले आहे का? त्यामुळेच काँग्रेसचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, “चार काय पाचही गुन्हे असतील तरी चालेल. फक्त उमेदवाराकडे जिंकण्याची क्षमता हवी.” पण कमलनाथ तरी काय करतील? कारण त्यांचे आदर्शच आहेत हेरॉल्ड खटला सुरू असलेले काँग्रेसचे सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी. शशी थरूर वगैरे तर हिमनगाचे टोक आहेत. महाराष्ट्राने तर काँग्रेसचे आदर्शावर आदर्श घोटाळे पाहिलेत. त्यामुळे कमलनाथ आणि पर्यायाने काँग्रेसला गुन्हेगारीचे वावडे नाहीच किंबहुना कमलनाथ यांना पक्षांतर्गतही या न्यायाने उमेदवारांची कमी नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@