माणसाच्या मानसिक ताणतणावाचा शरीरावर थेट परिणाम होत असतो व त्यामुळे चैतन्यशक्ती कमी किंवा कमकुवत होते, ते आपण पाहिले.
माणसाच्या मानसिक ताणतणावाचा शरीरावर थेट परिणाम होत असतो व त्यामुळे चैतन्यशक्ती कमी किंवा कमकुवत होते, ते आपण पाहिले. काही आजारांमध्ये आपण असे बघतो की, आजाराच्या लक्षणांना तात्पुरता आराम पडावा म्हणून काही औषधोपचार केले जातात. यामध्ये रुग्णाला तात्पुरते बरे वाटतेही. उदाहरण पाहायचे झाले, तर आपण वेदनाशामक औषधांचे घेऊ. एखाद्या जुनाट आजारावर तात्पुरत्या वेदना कमी करण्यासाठी म्हणून लोक सतत वेदनाशामक गोळ्या (Pain killers) घेत राहातात. पण, या वेदनाशामक गोळ्यांमुळे मूळ आजार बरा होत नाही, तर वरवरचे दुखणे तात्पुरते कमी होते व औषधाचा परिणाम संपताच परत चालू होते. याशिवाय या औषधांचा मूत्रपिंडावर वाईट परिणाम होत असतो तो वेगळाच. सतत ही तात्पुरता आराम देणारी औषधे घेत राहिल्याने आजाराची वा रोगाची पूर्ण दिशाच बदलते. हा आजार अजून खोलवर जातो वरकरणी बरे वाटते. पण, आजार जास्त महत्त्वाच्या अवयवांकडे पसरतो. शरीरावर त्याचेदेखील परिणाम दिसू लागतात. हळूहळू मग आजार असाध्य होतो. हे एक प्रकारचे ‘रोग दमन’ किंवा ‘suppression’ आहे. यामुळे मूळ आजार तर वाढतोच आणि त्याशिवाय नवीन आजारही तयार होतो, जो आतून कुठल्या तरी अवयवाला त्रास देत राहतो.
होमियोपॅथिक चिकित्सांकडे अशा अनेक केसेस येतात, जेथे औषधांच्या अतिसेवनामुळे व दुष्परिणामामुळे मूळ रोगाची लक्षणेच दडपली जातात व पर्यायाने तो रोग असाध्य होतो. या औषधांच्या परिणामामुळे चैतन्यशक्तीला स्वत:च्या पद्धतीने व्यक्त होण्यापासून रोखले जाते व त्यामुळे आजाराची खरी लक्षणे व स्वरूप कळत नाही. आता आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत. शरीरातील नैसर्गिक लक्षणे दडपण्याचे काम काही औषधे किंवा तत्सम पदार्थ करतात. नैसर्गिक स्त्रावांपैकी एक स्त्राव म्हणजे आपला घाम. शरीरातील उष्णतेचा समतोल राखण्यासाठी शरीरात घामाच्या ग्रंथी देवाने दिलेल्या आहेत. घाम येणे ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. साधारपणे डोके, पाय, काख अशा ठिकाणी जास्त घाम येतो. शरीरातील अपायकारक द्रव्येसुद्धा घामावाटे बाहेर टाकली जातात व शरीराचा समतोल राहतो. ज्यावेळी या नैसर्गिक घाम येण्याच्या ठिकाणी डीओडरन्ट, स्प्रे, औषधी पावडर किंवा काही जेल लावले जाते, तेव्हा शरीराचा हा नैसर्गिक स्त्राव दाबला जातो, दडपून टाकला जातो. परिणामी, शरीरातील अपायकारक द्रव्ये जी घामावाटे बाहेर टाकली जातात ती शरीरातच राहतात व पुढे मागे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
Natural discharges म्हणजे नैसर्गिक स्त्रावांमध्ये महिलांमधील मासिक पाळी हीदेखील येते. महिन्यांमध्ये येणारी मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु, कित्येक स्त्रिया मासिक पाळीमध्ये काही संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्स घेत राहातात (मासिक पाळीसाठी काही औषधे घेतात) व या हॉर्मोन्स(औषधांमुळे)मुळे मासिक पाळीचा स्त्राव हा दबला जातो. कित्येकदा गर्भनिरोधक गोळ्या ज्या मुख्यत्वे संप्रेरकेच (हॉर्मोन्स) असतात. त्यांचा अतिरेकी वापर केल्यामुळे मासिक पाळीच्या नैसर्गिकतेवर परिणाम होतो व त्याचाच परिणाम म्हणून मग स्त्रियांमध्ये हल्ली गर्भाशयाच्या संबधित गंभीर आजार होण्याचे प्रमाण वाढले दिसतात. याच संप्रेशनमुळे मग अनेक वेळा गर्भाशय तसेच स्तनांचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. म्हणूनच या अशा औषधांचा वापर हा विचार करूनच करावा. ‘रोगदमन’विषयी आपण अजूनही काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत पण, ती पुढील भागात.
-डॉ. मंदार पाटक
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/