मसूदची साद, त्याला छद्मपुरोगाम्यांचा प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |


मसूद अझहरच्या, “बाबरी मशीद आम्हाला बोलावतेय,” या वक्तव्यामुळे देशातल्या अजून एका मोठ्या गटाला उकळ्या फुटल्या आहेत. हा गट म्हणजेच छद्मपुरोगाम्यांचा. बाबरी मशीद पाडल्यामुळे भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडली, असा एक विचित्र दावा पेश करणारे विचारवंत ल्युटन्ट दिल्लीत आजही शिल्लक आहेत. पण, सर्वसामान्य माणसाचा बुद्धीभेद करणार्‍या या दाव्याला कुठलाही आधार नाही.

 

आमची बाबरी मशीद पाडून त्या ठिकाणी मंदिर उभारले जात आहे. त्या ठिकाणी हिंदू लोक एकत्र आले आहेत. पुन्हा एकदा बाबरी मशीद आम्हाला बोलावत आहे,” हे उद्गार आहेत, मौलाना मसूद अझहर याचे. मौलाना मसूद अझहर म्हणजे तोच, ज्याला १५६ नागरिकांच्या बदल्यात भारत सरकारला सोडावे लागले. मसूद अझहर हा भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी असला तरी त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो दहशतवादी कारवायांत थेट सामील होत नाही. कुठल्याशा विचित्र कारणामुळे त्याला दहशतवादी गटात सामील करून घेतले गेले नव्हते. त्यामुळे हा इसम मौलाना झाला. जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना त्याने काढल्या आणि त्यातूनच दहशतवादाची कीड पसरविण्याचे काम हा माणूस अव्याहतपणे करत आहे.

 

मसूद अझहर मुसलमानांना चिथावणी देणारी ही विधाने बाबरी ढाचाच्या पार्श्वभूमीवर करत आहे. यात त्याचे दोन अंतस्थ हेतू दडल्याचे उघडपणे दिसते. इथे मसूदचा संदेश मिळवणारे दोन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे, कट्टर इस्लामी गट आणि दुसरे म्हणजे हिंदुत्वाच्या नावावर बोंबा मारणारे छद्मपुरोगामी व विचारवंत. या दोन्ही गटांना खाद्य देऊन तो त्यांना आपल्यामागे उभे करू इच्छितो. परिणामी, मसूदसारख्यांच्या शब्दांवर माना डोलावणार्‍या या दोन्ही गटांतील लोकांना त्याची ही विधाने आवडली असतीलच. दुसरीकडे मसूद अझहरचा बाबरीप्रेमाचा उमाळा आजचा नाही, तर १९९४ साली मसूद अझहर उद्ध्वस्त बाबरी ढाच्यावर पोहोचला होता. तिथे गेल्यावर त्याने बाबरी ढाच्याची माफी मागितली. बाबरी मशीद म्हणजे आमच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक होती. ते पूर्वीचे दिवस आपण बाबरीला पुन्हा मिळवून देऊ, अशी घोषणा त्याने केली होती. मसूद अझहरच्या मुखातून जणू काही गाझीच बोलला, अशा थाटात त्यानंतर मसूद अझहरचे कौतुकही झाले होते व पुढे धर्मांध इस्लामी गटांत त्याला चांगली लोकप्रियताही मिळाली होती.

 

बाबरीसंदर्भातील मसूद अझहरच्या आवाहनामुळे चेकाळलेला धर्मांध मुस्लिमांचा गट या देशात अजूनही आहे. १९९२ साली लाखो छिन्नभिन्न झालेल्या बाबरी ढाच्याप्रति त्यांच्या मनात आजही कळवळा दाटून येतो. पण, ७११ सालच्या मोहम्मद-बीन-कासिमच्या भारतावरील पहिल्या आक्रमणापासून पुढची १२०० वर्षे बुतशिकनांनी इथल्या हिंदू मानचिन्हांची केलेली तोडफोड, नासधूस त्यांच्या गावीही नसते. परकीय आक्रमकांनी इथली शेकडो, हजारो मंदिरे पाडली, तेव्हा हिंदूंच्या भावनांचा त्यांनी कधीही विचार केला नाही. हिंदू धर्म नष्ट होण्यासाठीच त्यांनी ही कुकृत्ये केली. भारतीयांनी मात्र नेहमीच जगातल्या सर्वच संस्कृतीच्या, धर्माच्या, वंशाच्या लोकांना आपल्यात सामावून घेतले. भारतात जो आला तो इथलाच होऊन गेला. पण, म्हणून काय कोणी आमच्या पवित्र जागेवर आमची मंदिरे पाडून आपली प्रार्थनास्थळे उभारू धजावेल, तर ते होणार नाही. याच विचाराने इथल्या हिंदूंनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी पुन्हा मिळवण्यासाठी ऐतिहासिक काळात ७६ वेळा आणि त्यानंंतर ९२ साली एक असा ७७ वेळा लढा दिला. हा हिंदू अस्मितेचा उद्रेक होता. पण, हिंदू म्हणजे काफिर आणि काफिरांचा द्वेष करणे हाच आपला धर्म या वृत्तीवर पोसलेल्या धर्मांधांना ना हिंदूंच्या भावना दिसत ना दुःख ना उद्रेक. त्यांना दिसतात ते फक्त मसूद अझहर, ओवेसींसारखे कट्टरतावादी. म्हणूनच आजही बाबरी ढाच्यावर पुन्हा एकदा मशीद उभारली जावी आणि तिथे आपली दररोज पाचवेळा नमाज पढायची इच्छा पुरी व्हावी, अशी इच्छा हा धर्मांध गट बाळगतो. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारणीतला अडथळा हेच लोक आहेत.

 

अशीच मांडणी करून धर्मांध मुसलमानांची मने जिंकणे हा तसा नवा डाव नक्कीच नाही. याआधीही अनेकांनी याच मार्गाने जात दाढ्या कुरवाळण्याची हौस भागवून घेतली आहेच. सध्या भारतातून परागंदा असलेला झाकीर नाईक नावाचा सुटाबुटातला मौलाना गेली काही वर्षे अशीच मांडणी करत होता. हा देश मुघलांकडून इंग्रजांनी घेतला. त्यामुळे या देशाचे खरे दावेदार आम्हीच आहोत, अशी ही मांडणी होती. यातूनच मुसलमान हे ‘जेते’ आणि हिंदू हे ‘जित’ अशी विभागणी करून धर्मांध मुसलमानांच्या मनात दिल्लीच्या तख्ताचे स्वप्नही जागवले गेले. मात्र, या मांडणीचे विष डोक्यात भिनल्याने दहशतवादी कारवाया करणारी काही बांगलादेशी कोवळी पोरं समोर आली व झाकीरचा बुरखा फाटला. आपणच इथले राज्यकर्ते आहोत वा बाबरी ढाच्याचे मालक आपण आहोत असली मांडणी करून मुसलमानांच्या मुलांना फसवणे हा जुनाच धंदा आहे. म्हणूनच मसूद अझहरच्या कालपरवाच्या आवाहनात नवीन काहीच नाही, असे स्पष्ट होते.

 

मसूद अझहरच्या, “बाबरी मशीद आम्हाला बोलावतेय,” या वक्तव्यामुळे देशातल्या अजून एका मोठ्या गटाला उकळ्या फुटल्या आहेत. हा गट म्हणजेच छद्मपुरोगाम्यांचा. बाबरी मशीद पाडल्यामुळे भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडली, असा एक विचित्र दावा पेश करणारे विचारवंत ल्युटन्ट दिल्लीत आजही शिल्लक आहेत. पण, सर्वसामान्य माणसाचा बुद्धीभेद करणार्‍या या दाव्याला कुठलाही आधार नाही. कारण, या तथाकथित विचारवंतांचा क्रिया-प्रतिक्रियेचा दावा मानायचा तर मग जगभरातल्या मुस्लीम दहशतवादामागेही अयोध्याकांडच होते-आहे, असे समजायचे का? अर्थात, रमजान ईदच्या शिरखुर्म्याची गुळणी तोंडात धरून बसलेल्या या विचारवंतांकडे याचे उत्तर नसेलच. त्यांच्यादृष्टीने ते दहशतवादीही मासूम आणि अन्यायाला बळी पडणारेच असतील. पण, या लोकांची लायकी माहिती असल्याने त्यांना आज कोणी हिंग लावूनही विचारत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांबाबत मनात इच्छा असूनही थयथयाट करण्यावाचून या लोकांना अन्य काही करता येत नाही.

 

दुसरीकडे मसूद अझहर आज चिडलेला आहे तो बाबरीमुळे, हे नक्कीच. पण त्याला बिळातून बाहेर काढून तळमळण्याची संधी आणखी एका गोष्टीने मिळालीय, ती म्हणजे भारतीय सुरक्षा जवानांचा पराक्रम. गेल्या सहा दिवसांत मसूदच्या कोचिंग क्लासमधून धडे घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या २२ जणांना भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी कंठस्नान घातले आहे. त्यामुळे जिहादच्या नेक कामासाठी जणू काही स्वतःच्या घरातलीच लेकरेबाळे गमावल्याची भावना झालेल्या मसूद अझहरची तगमग उफाळून आली. त्यातूनच त्याने बाबरी ढाचा आपल्याला बोलावत असल्याचे म्हटले. पण, मसूद अझहरने कितीही आवाहने केली तरी त्याच्यासकट त्याच्या इच्छा-आकांक्षांची थडगी बांधायला इथली जनता सक्षम आहे, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@