मुंबईतील एका कार्यक्रमात आमीर खानने ही जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले. “मी आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमने हा सिनेमा उत्तम बनविण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. परंतु आमच्याकडून काहीतरी चूक झाली असे मला वाटते. या चुकीची जबाबदारी मी स्वीकारतो. आम्ही सगळ्यांनी या सिनेमासाठी परिपूर्ण मेहनत घेतली होती, यावर विश्वास ठेवा.”असे आमीर खानने यावेळी म्हटले.
“माझे सर्व सिनेमे हे मला माझ्या मुलाप्रमाणे असतात. जे प्रेक्षक सिनेमाकडून अपेक्षा ठेवून आले होते त्यांची मी माफी मागतो, कारण मी त्यांचे मनोरंजन करू शकलो नाही. प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने हा सिनेमा पाहण्यासाठी आले होते, परंतु त्यांना तो आवडला नाही. या गोष्टीबद्दल मला खेद आहे.” असे आमीर खानने म्हटले. आमीर खानच्या ट्विटरवरील एका फॅनपेजने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला.
गेली २ वर्षे या सिनेमाचे काम चालू होते. परंतु सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळू शकली नाही. सिनेमाच्या अपयशामुळे प्रदर्शकांनी सिनेमाच्या टीमकडून पैसे परत मागितले, अशा बातम्या मध्यंतरी या सिनेमाच्या बाबतीत ऐकायला मिळत होत्या. सिनेमाच्या अपयशानंतर संपूर्ण टीमने याबाबत बोलण्यास मौन बाळगले होते. परंतु आमीर खानने समोर येऊन सिनेमाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे.
८ नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, आमीर खान यांसारखे मोठे कलाकार असूनही सिनेमाने कसाबसा १५० कोटींचा आकडा पार केला. पहिल्या दिवशी सिनेमाने ५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर मात्र कमाईचा हा आकडा हळूहळू उतरत गेला. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ हा सिनेमा आता येत्या डिसेंबर महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याजोगे असेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/