अलवर : “राम मंदिर उभारणीसाठी काँग्रेसमुळेच विलंब होत आहे. राम मंदिरप्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेस बाधा निर्माण करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी राम मंदिरच्या विषयावर पहिल्यांदाच काँग्रेसवर हल्लाबोल केला. राजस्थानमधील अलवर येथे मोदींची प्रचारसभा झाली. त्यावेळेस त्यांनी राम मंदिरच्या मुद्द्यावरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
“अयोध्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असताना, काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदारांनी सांगितले की २०१९मध्ये निवडणुका आहेत. तोपर्यंत खटला चालवू नका. देशाच्या न्यायव्यवस्थेला राजकारणात खेचणे हे योग्य आहे का?,”असा सवाल पंतप्रधानांनी केला. “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेव्हा अयोध्यासारख्या संवेदनशील प्रकरणावर देशाला न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वकील न्यायमूर्तींविरोधात महाभियोग दाखल करून त्यांना भीती दाखवत होते. काँग्रेसने आता न्यायमूर्तींना भीती दाखवणे आणि धमकावण्यास सुरुवात केली आहे,” असा गंभीर आरोप मोदींनी केला. पुढे ते म्हणाले, “काँग्रेस जातीवाद पसरवत आहे, विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळेच ते जातीचा मुद्दा उपस्थित करत आहेत.”
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/