नागपूर : बांधकामाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर झपाट्याने बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक, अद्ययावत, शाश्वत, स्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याचे आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्वीकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे ७९व्या इंडियन रोड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी रस्तेबांधणी व रस्ते विकासाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या अभियंत्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘आयआरसी’मधील विविध पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या उभारणीमध्ये रस्ते बांधणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृती आणि परंपरांनाही रस्ते जोडतात. रस्त्यांच्या माध्यमातून व्यापार-उदीम वाढीस लागतो.
कमी खर्चातील रस्ते बांधणीवर भर
देशामध्ये रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर असून दर्जेदार व कमी खर्चातील रस्ते बांधणीवर विशेष भर देण्यात येत असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच रस्तेबांधणीच्या क्षेत्रात नवीन संशोधनामध्ये रस्ते बांधकामासाठी प्लॅस्टिक, काच व अन्य काही टाकाऊ वस्तूंचा उपयोग करुन घेण्यात येत आहे. रस्तेबांधणीत अनेकवेळा अपरिहार्यपणे झाडे कापावी लागतात. परंतु त्याहून अधिक वृक्ष लागवड करणे व झाडांची पुनर्स्थापन करणे यावर भर द्यावा लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/