दरबार साहिब या गुरुद्वारापर्यंत जमिनीवर एकसमान कॉरिडोअर बांधण्याची विनंती पाकिस्तानला सरकार करणार आहे. पाकिस्तानमधील करतारपूर येथे असलेल्या गुरुदेव दरबार साहिब हा गुरुद्वारा आहे. या ठिकाणी शीखांचे धर्मगुरु गुरुनानक यांनी १८ वर्षे व्यतीत केली होती. हा करतारपूर कॉरिडोअर बांधण्यासाठी भारत सरकारकडून निधी देण्यात येणार आहे. भारतातील डेरा बाबा नानक येथून पाकिस्तानातील करतारपूर साहिब इथपर्यंत हा करतारपूर कॉरिडोअर असणार आहे. शीखांची दोन धार्मिक स्थळे यामुळे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. पण पाकिस्तान सरकार करतारपूर कॉरिडोअर शीख धर्मीयांसाठी खुला करणार का? हा प्रश्न पाकिस्तान सरकारला गेल्या महिन्यात विचारला गेला होता. पण भारत सरकार करतारपूर कॉरिडोअरबाबत पाकिस्तान सरकारशी संवाद साधणार की नाही? यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. असे पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आले होते.
२०१९ मध्ये गुरुनानक यांची ५५० वी जयंती आहे. हे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अरुण जेटली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. गुरुनानक यांची ५५० वी जयंती ही मोठ्या पद्धतीने साजरी करण्याचे सरकारने ठरविले आहे. आतंरराष्ट्रीय विमानतळावर असणाऱ्या सुविधांप्रमाणे सर्व सुविधा या करतारपूर कॉरिडोअरमध्ये असतील. ज्या व्यक्तींना सीमा ओलांडणे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी टेलिस्कोपिक पॉईंट्स बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांना गुरुद्वाराचे दर्शन घेता येईल. ३ ते ४ किलोमीटर लांबीचा हा कॉरिडोअर असणार आहे.
गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती दिवशी त्यांच्या शिकवणीवर आधारित कार्यक्रम दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यादिवशी विशेष नाणी आणि शिक्के प्रकाशित करण्याची योजनाही सरकारने आखली आहे. तसेच गुरुनानक यांच्याविषयी आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीविषयी पुस्तके नॅशनल बुक ट्रस्टद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहेत. ही पुस्तके भारतातील सर्व भाषांमध्ये प्रकाशित होणार आहेत. तसेच या पुस्तकांचा जगातील इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यात यावा. अशी विनंती भारत सरकार यूनेस्कोला करणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/